ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:34+5:302021-02-27T04:15:34+5:30

सुमीत हरकूट चांदूर बाजार : ऊन, वारा, पाऊस असो वा सण उत्सव, नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिसांची तैनाती असतेच. आंदोलन, मोर्चे, ...

No duty time, no salary match! | ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ!

ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ!

सुमीत हरकूट

चांदूर बाजार : ऊन, वारा, पाऊस असो वा सण उत्सव, नागरिकांच्या सुरक्षेकरिता पोलिसांची तैनाती असतेच. आंदोलन, मोर्चे, नेत्यांचा सुरक्षेकरिता कडेकोट बंदोबस्ताला पोलीसच हवे असतात. कर्तव्यावर असताना वेळेचे भान नाही. कुटुंबाकरिता वेळ नाही. २४ तास तैनातीची टांगती तलवार, सतत काम असतानासुद्धा एखादी क्षुल्लक चूक जरी घडली तरी खापर मात्र पोलिसांचा माथी मारले जाते. एवढी सेवा देऊनही पोलिसांचे जीवन म्हणजे ना ड्युटीचा वेळ, ना पगाराचा मेळ असे झाले आहे.

कोणत्याही धर्माचा किंवा समाजाचा सण असो, नागरिक तो आनंदाने साजरे करीत असतात. पोलीस या आनंदात विरजण पडू नये म्हणून रस्त्यावर तैनात असतात. बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांच्या डोक्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात असतो. तणावाखाली असलेल्या पोलिसांना विविध आजार जडतात. आपले आजार अंगावर घेऊन २४ तास नोकरी करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काचीही सुट्टी उपभोगता येत नाही. आपल्या हक्काच्या सुटीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची अनेकदा हुजूरी करावी लागते. त्याशिवाय त्यांना सुटी दिली जात नाही.

नक्षलग्रस्त भागात तर पाहिजे त्या प्रमाणात पोलिस यंत्रणासुद्धा नाही. त्यामुळे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण असतो. एखाद्या कुजलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे कामही या पोलिसांना करावे लागते. परंतु, शिस्त पाळावी लागत असल्याने मुकाट्याने अन्याय सहन करूनही आंदोलन वा धरणे देण्याचा अधिकार पोलिसांना नाही. चूक असो किंवा नसो, "बॉस इज ऑलवेज राईट" अशाच भूमिकेत पोलिसांना राहावे लागते. इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत त्यांना वेतन कमी असते, तेही अनेकदा वेळेवर मिळत नाही.

बॉक्स

कामाला महत्व

पोलिसांना आपल्या कुटुंबाला देण्यासाठी वेळच उरत नाही. नोकरीवरून परत आल्यानंतर पत्नी किंवा मुलाबाळांना दुकानात खरेदीसाठी किंवा इतर ठिकाणी जाण्याची तयारी केली आणि त्याच वेळी पोलीस ठाण्यातून कॉल आला, तर त्यांना सर्व कामे बाजूला सारून आधी कर्तव्यावर जावे लागते. सतत कामात जुंपले असतानाही पोलिसांना पाहिजे तसा आदर मिळत नाही. वाट्याला येते ते फक्त निर्भत्सना.

आदर राखणे गरजेचे

सातत्याने नागरिकांचा सेवेत असलेल्या पोलिसांचा चुका काढण्यापेक्षा त्यांचा कामाचा आवाका पाहता, शासन व नागरिकांनी पोलिसांविषयी सन्मान व आदर व्यक्त करणे गरजेचे आहे. असे घडून आल्यास पोलिसांचा कामात प्रामाणिकता येऊन त्यांचा कामाचा, ताणाचा श्रमपरिहार झाल्याचा आनंद पोलिसांना होईल, हे मात्र निश्चित.

Web Title: No duty time, no salary match!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.