व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला जाळीचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:23 IST2018-07-06T22:23:36+5:302018-07-06T22:23:55+5:30

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Nile fencing in Tiger Reserve | व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला जाळीचे कुंपण

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला जाळीचे कुंपण

ठळक मुद्देशासन देणार ९० टक्के रक्कम : शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या हैदोसापासून मिळणार मुक्तता

अमरावती : व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
शेतातील पीक रानडुक्कर, नीलगाय आदीे वन्यप्राण्यांमुळे उद्ध्वस्त होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वनविभागाकडून शेतकºयांना पीक नुकसानभरपाई दिली जात असली तरी ही रक्कम तुटपुंजी असल्याची ओरड शासनाकडे आमदारांनी केली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढीस लागला असून, हे टाळण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत वनाशेजारी गावकºयांना विविध योजना राबवून त्यांचे बळकटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासननिर्णय क्रमांक ०५१७ अन्वये २१ मे २०१८ नुसार राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात मेळघाट, पेंच, ताडोबा, नागझिरा व बोर व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना पीक नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील भागातील शेतीला जाळीचे कुंपण देण्याचा निर्णय झाला आहे.
अशी आहे योजना
ज्या शेतकऱ्याची शेती व्याघ्र प्रकल्प व अतिसंवेदनशील भागास लागून आहे, अशा १० अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत सामूहिक लाभ घेता येईल. एक हजार मीटर लांब जाळीचे कुंपण शेतीला केले जाणार आहे. कुंपणाची उंची १.८० मीटर असणार आहे. १० वर्षांपर्यत कुंपण व्यवस्थित ठेवावे लागणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १०० रोपे शेतात लावून त्यांचे संगोपन करावे लागणार आहे.
वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गावर कुंपण नाही
व्याघ्र प्रक ल्पानजीक शेतकऱ्यांना सामूहिक जाळीचे कुंपण देताना त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा ९० टक्के वाटा शासन उचलणार आहे. १० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करावी लागेल. मात्र, वाघ, बिबट आदी वन्यप्राण्यांचा भ्रमण मार्ग असल्यास त्या ठिकाणी जाळीचे कुंपण केले जाणार नाही.
प्रादेशिक वनविभागाला वगळले
राज्यात व्याघ्र प्रकल्प वगळता प्रादेशिक वनविभाग जंगलाशेजारील शेतात पीक नुकसानाच्या सातत्याने घटना घडल्या आहेत. या भागात वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभागाला या योजनेतून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांमध्ये वनविभागाप्रति रोष व्यक्त केला जात आहे.

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतात जाळीचे कुंपण लागणार असल्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळता येईल. शासनाची ही योजना गरीब, सामान्य शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणारी आहे.
- सुनील लिमये
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर.

Web Title: Nile fencing in Tiger Reserve