दुष्काळाच्या निश्चितीला बगल, उपाययोजनांची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:41 IST2018-03-05T22:41:07+5:302018-03-05T22:41:07+5:30
खरिपामध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १,९६३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याला शासनाने बगल दिला.

दुष्काळाच्या निश्चितीला बगल, उपाययोजनांची मात्रा
गजानन मोहोड।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : खरिपामध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १,९६३ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याला शासनाने बगल दिला. यापैकी बहुतांश गावांमध्ये दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू करण्यात आला असतानाही शासनाने पुन्हा शब्दच्छल केला. या सर्व गावांत दुष्काळस्थितीसाठी प्रचलित निकषाप्रमाणे आठ प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. याविषयीच्या सूचना महसूल विभागाने २८ फेब्रुवारीला जाहीर केल्या.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३४ टक्के पाऊस कमी पडला. १२० पैकी ४५ दिवस पावसाचे राहिलेत. त्यामुळे अल्प कालावधीची मूग, उडीद, सोयाबीनसारखी पिके बाद झाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १९६३ गावांमध्ये खरिपाची अंतिम ४६ पैसेवारी जाहीर करण्यात आली. दुष्काळ जाहीर करण्याची कार्यपद्धती ७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने जाहीर केल्यामुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या दुष्काळ देखरेख समितीद्वारा या विषयीचा अहवाल कृषी आयुक्तांना पाठविला. यामध्ये जलनिर्देशांकाच्या आधारे बहुतांश गावांत दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागू करण्यात आला. प्रत्यक्षात अंमलबजावणी यंत्रणेलाच समितीच्या कार्यकक्षा माहीत नसल्यामुळे याचा बोजवारा उडाला. गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुके वगळता मध्यम स्वरूपाचा दुष्काळ विदर्भात जाहीर करण्यात आलेला नाही. शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी आता पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृद् आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक या आधारे दुष्काळाचे मूल्यमापन करून उपाययोजना सुचविल्या जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले असले तरी जिल्ह्यात उपाययोजना समितीने सुचविल्या नसल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात या सवलती लागू
जमीन महसुलात सूट
सहकारी कर्जाचे पुनर्गठण
शेतीकर्ज वसुलीस स्थगिती
कृषिपंपाच्या चालू बिलात ३३.५ टक्के सूट
शाळा, महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ
रोहयो कामाच्या निकषात सुधारणा
पाणीपुरवठ्यासाठी टँकर
कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे
सुविधा मिळणाऱ्या गावांची तालुकानिहाय संख्या
जिल्ह्यातील १,९६३ गावांमध्ये खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ आहे यामध्ये अमरावती तालुक्यात १३९, भातकुली १३७, तिवसा ९५, चांदूररेल्वे ९०, धामणगाव रेल्वे ११२, नांदगाव खंडेश्वर १६१, मोर्शी १५६, वरूड १४०, अचलपूर १८४,चांदुरबाजार १७०, दर्यापूर १५०, अंजनगाव सुर्जी १२७, धारणी १५२, चिखलदरा तालुक्यात १५० गावांचा समावेश आहे.