नांदगाव पेठचा टोल नाका वरुड-मोर्शीकरांसाठी डोकेदुखी
By Admin | Updated: December 20, 2014 00:21 IST2014-12-20T00:21:03+5:302014-12-20T00:21:03+5:30
राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो.

नांदगाव पेठचा टोल नाका वरुड-मोर्शीकरांसाठी डोकेदुखी
अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव (पेठ) येथील टोलनाक्याच्या बेंबदशाहीमुळे वरुड मोर्शी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे. सदर टोल टॅक्स हा किलोमीटरप्रमाणे घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. राजकारण्यांच्या कार्यकर्त्याना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनीधींना सुध्दा टोल फ्री पासेस मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष उफाळून येत आहे.
राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही टोल फ्री पासेस दिल्या आहेत. चौपदरी राष्ट्रीय महामार्ग हा अमरावती ते नागपूरकडे जातो. परंतु वरुड, मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सुध्दा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे खासगी वाहनधारकांनीसुध्दा आपले भाडे वाढवून ग्राहकांवरच बोझा लादला आहे. एसटीलासुध्दा टोल भरावा लागत असल्याने याचा भुर्दंड प्रवाशांवर पडतो. परंतु याकडे राजकारण्यांचे लक्ष नाही. एकीकडे वाहनचालकांना परिवहन विभागाचा वाहन कर, रस्ता कर (रोड टॅक्स) भरावा लागतो. यामध्ये सहा चाकी ट्रकला १३ हजार ३६४ रुपये वार्षिक, दहा चाकी टॅ्रक मालकाकडून २१ हजार ७८० रुपये वार्षिक, १२ चाकी ट्रकला २९ हजार १२० रुपये वार्षिक, असा अवाढव्य वार्षिक रोड टॅक्स परिवहन विभाग वसूल करतात. रस्त्यावरुन चालण्याचासुध्दा टॅक्स यात समाविष्ट असतो. तरीसुध्दा बीओटी तत्त्वावर रस्त्याची निर्मिती करुन ठेकेदारांना टोलटॅक्स वसुलीचा भुर्दंड देऊन वाहनचालकासह नागरिकांची आर्थिक लूट करण्याचे षड्यंत्र शासनाने चालविले आहे. टोलटॅक्स घेत असल्याने परिवहन विभागाचा रोडटॅक्स कशासाठी? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. अमरावती ते टोलनाका नांदगाव (पेठ ) हे केवळ ९ कि.मी.चे अंतर असताना वरुड मोर्शी तालुक्यातील नागरिकांना चारचाकी वाहनांकरिता जाणे-येणे १२० रुपये तर जाणे ८० रुपये, हलके भाडोत्री वाहने १८५ रुपये जाणे येणे तर जाण्यासाठी १२५ रुपये, दोन अॅक्सेल ट्रक, बसकरिता ३८० रुपये जाणे-येणे तर जाण्यासाठी २५५ रुपये, जड वाहने दोनपेक्षा अधिक अॅक्सेल, जेसीबीसह अन्य जड वाहनांसाठी जाणे-येणे ५८५ रुपये तर जाणे ३९० रुपये, सात किंवा त्यापेक्षा अधिक अॅक्सेलच्या जडवाहनांकरिता जाणे-येणे ७३५ रुपये आणि जाणे ४९० रुपये असा टोल द्यावा लागतो. तर ट्रककरिता वाहनांच्या क्षमतेनुसार टॅक्स आकारण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाची वाहने, रुग्णवाहिका, अग्निीशमन, मंत्री, राज्यपालासह आदी अधिकाऱ्यांच्या वाहनांना टोल नाही. टोल नाका ते नांदगाव (पेठ) पासून वळण घेऊन पुढे मोर्शी, वरुडकडे येणाऱ्यांना हा विनाकारणचा भुर्दंड सहन करावा लागतो. परंतु टोल टॅक्स घेत असल्याने नांग्दगाव ते वरुडपर्यंत असलेल्या राज्य महामार्गाचीसुध्दा तेवढ्याच गंभीरतेने सुधारणा करावी, म्हणजे टोल टॅक्स देताना वानहनचालकांची लूट होणार नाही. नांदगाव ते वरुड मार्गाची दुर्दशा झाली आहे.