महापालिकेतील कंत्राटे बगलबच्च्यांनाच !
By Admin | Updated: October 10, 2016 00:17 IST2016-10-10T00:17:19+5:302016-10-10T00:17:19+5:30
नागरिकांकडून करांच्या माध्यमातून वसूल होणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून शहरात विकासकामे केली जातात.

महापालिकेतील कंत्राटे बगलबच्च्यांनाच !
सत्तेचा गैरवापर : यंत्रणेचा कानाडोळा
अमरावती : नागरिकांकडून करांच्या माध्यमातून वसूल होणाऱ्या कोट्यवधी रुपयांमधून शहरात विकासकामे केली जातात. मात्र त्या रुपयांच्या कामाची कंत्राटे सत्ताधिशांच्या बगलबच्च्यांना दिले जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे.
आठ लाख अमरावतीकरांच्या खिशातून दरवर्षी मालमत्ता कर आणि अन्य करांमधून सुमारे १०० कोटी रुपये संकलित करण्यात येतात. त्यातून मूलभूत सुविधांसह अन्य विकासकामे केली जातात. मात्र स्पर्धेत न उतरता अनेक कामे आप्तस्वकीयांना दिले जातात. याशिवाय निविदा प्रक्रिया मॅनेज करून आपला टक्काही पक्का केला जातो.
महापालिकेत कुठलेही काम विनाकमिशन केले जात नसल्याची अमरावतीकरांची पक्की धारणा बनली आहे. अर्थसत्ता हाती असल्याने त्याचा लाभ आप्तस्वकीयांसह मर्जीतील बगलबच्च्यांनाच व्हावा, यासाठी एक यंत्रणाच महापालिकेत उभारण्यात आली आहे. विरोधकांच्या तुलनेत सत्ताधिशांचा यंत्रणेवर अनामिक दबाव असतो. त्यामुळेच नियमांची पायमल्ली करीत शासननिर्णयाच्या चाकोरीला ठेंगा दाखवीत काका, मामा, भाऊ व अन्य सोयऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची कंत्राटे घेतली जातात. स्वच्छतेपासून सुरक्षारक्षक पुरविण्यापर्यंत बहुतेक सारे कंत्राट विशिष्ट व्यक्तींपुरते मर्यादित झाले आहे. यातील बहुतांश कंत्राटदार राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आतल्या गोटातील आहेत. ही बाब कुणीही नाकारू शकत नाही. मात्र उघडपणे कुणीही बोलण्यास पुढे येत नसल्याने या बगलबच्च्यांचे चांगलेच फावले आहे. (प्रतिनिधी)
महापालिका कर्मचाऱ्यांची भागिदारी
महपालिका आस्थापनेवर असलेल्या काहींनी भागिदारीमध्ये कंत्राटदारीचा व्यवसाय सुरू केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. सत्ताधिशांशी असलेल्या जवळीकीचा अर्थपूर्ण लाभ घेण्यासाठी ही मंडळी सरसावली आहे.
त्याची भूमिका काय ?
अमरावती महापालिका स्मार्टसिटीच्या मुख्य आणि पुरवणी परीक्षेला सामोरी गेली. मात्र दोन्ही वेळा महापालिका उत्तीर्ण होऊ शकली नाही. मुळात या परीक्षेचे नियोजन एका अतिहुशार अर्बन प्लॅनरमुळे बिघडल्याचे सर्वश्रुत आहे. उल्लेखनीय म्हणजे या ‘स्मार्ट’ व्यक्तिविरोधात पुण्यामध्ये फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल आहे. मात्र आजकाल तोच गळ्यातील ताईत बनल्याने यंत्रणेला अशा व्यक्तीत काय ‘इंटरेस्ट’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 'स्मार्ट डीपीआर'चे वाटोळे करणाऱ्या या व्यक्तीने पुन्हा स्मार्टसाठीच लुडबुड चालविली आहे.