तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या
By Admin | Updated: January 1, 2017 00:47 IST2017-01-01T00:47:59+5:302017-01-01T00:47:59+5:30
सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह

तिशीतील युवा शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या
धक्कादायक वास्तव : विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक, सातबारा कोरा करणे हा पर्याय
गजानन मोहोड अमरावती
सततचा दुष्काळ, नापिकीचे सत्र यामुळे वाढणारे कर्ज आदींमुळे नैराश्य येऊन दीड दशकात अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यातील १३ हजार ४५६ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये सर्वाधिक एक हजार ५३२ आत्महत्या ह्या ३० ते ४५ वयोटातील आहे व यामध्ये विमुक्त जाती-जमातीमधील शेतकऱ्यांचे प्रमाण २८ टक्के असल्याची धक्कादायक माहिती आहे.
१ जानेवारी २००१ ते २५ डिसेंबर २०१६ या कालावधीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या जिल्ह्यात ३ हजार ७०४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. २०१५ पर्यंत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा जिल्हा, अशी यवतमाळची ओळख होती. परंतु यंदा २०१६ मध्ये राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. यंदा २५ डिसेंबरपर्यंत ३४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापूर्वी राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणाऱ्या यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार विशेष मदतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम यंदा दिसून आले. विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी होत असल्याने शेतकरी आत्महत्येचा शोध घेण्यासाठी व तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच सामाजिक, आर्थिक व मनोवैज्ञानिक अभ्यासासाठी शासनाने ‘इंदिरा गांधी आॅफ डेव्हलपमेंट रिसर्च’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये शेतकरी आत्महत्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी किंवा कमी उत्पन्न, आजारीपणा, मुलीच्या लग्नासाठी कर्जबाजारी, शेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाही व शेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मूल्य वृद्धी नाही आदी अनेक कारणे समोर आली. यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यासाठी विशेष योजना राबविण्यात आल्या. मात्र खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत. कायमस्वरुपी व दीर्घकालीन उपाययोजनापेक्षा वरवरची मलमपट्टी करण्यावर आजवर शासनाने भर दिल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण काही जिल्ह्यात वाढत आहे.