मोझरी, भारवाडी फीडरवर नऊ तास भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:18 IST2018-10-14T22:17:35+5:302018-10-14T22:18:14+5:30
सूरज दाहाट । लोकमत न्यूज नेटवर्क तिवसा : तालुक्यात तब्बल ९ तास भारनियमन सुरू आहे. परिणामी विजेवरील उपकरण बंद ...

मोझरी, भारवाडी फीडरवर नऊ तास भारनियमन
सूरज दाहाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : तालुक्यात तब्बल ९ तास भारनियमन सुरू आहे. परिणामी विजेवरील उपकरण बंद राहत असल्यामुळे नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. यावर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
राज्यात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर होत असून, त्याचा पुरवठा कमी झाल्याने वीज निर्मितीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारनियमनाच्या वेळेत अधिकच वाढ झाल्याने नागरिकांची कामे प्रभावित होत आहे. त्याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील मोझरी, भारवाडी, गुरुदेवनगरातील फिडरला बसत आहे. नवरात्रोत्सवात भारनियमन सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. विजेअभावी ग्रामीण पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मागणीच्या तुलनेत वीज निर्मिती अल्प होत झाल्याने महावितरण कंपनीने ग्रामीण भागात तीन टप्प्यात ९ तास १५ मिनिटे भारनियमन सुरू केले. मात्र ज्या फीडरवर वीज ग्राहकांची वसुली ९० टक्के हून अधिक आहे असे फीडरर वरील गावे ग्राहकांना भारनीयमातुन सूट दिल्या जात असली तरी बहुतांश फिटरची वसुली ५५ते६०टक्के पेक्षा अधिक नसल्याने भारनियमनाची झळ सर्वांना पोहचली आहे. गुरुदेव नगर मोझरी फिटरची वसली ६२ टक्केपर्यंत पोहचली. मात्र, ३८ टक्के ग्राहकांनी वीज भरणा न केल्याने भारनीयमन सुरू झाले आहे.
भारनियमनामुळे पाणीटंचाईचे सावट
तालुक्यातील भारवाडी फीडरवर भारनियमन सुरू असल्याने या फीडरवरील वर्धा नदीच्या तिरावरून मोझरी, गुरुदेवनगर,तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, येथे भारनियमन सुरू असल्याने या ठिकाणी आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
सणासुदीत ९ तासांच्या भारनियमनामुळे सिंचन व पाणीपुरवठ्याअभावी नागरिकांचे हाल होत असल्याने युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-वैभव स वानखडे,
नगराध्यक्ष, न. पं. तिवसा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव २३ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. भारनियमनाचा या महोत्सवाला फटका बसू शकतो. त्यामुळे लोडशेडिंग बंद करावे.
बबलू मक्रमपूरे, सरपंच गुरुकुंज मोझरी