मोबाईलने मेमरी झाली फॉरमॅट; स्मरणशक्तीचा वापर झाला कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:31+5:302021-07-07T04:15:31+5:30
‘मोबाईल फास्ट’ संकल्पना राबवा अमरावती : मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंडी पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा ...

मोबाईलने मेमरी झाली फॉरमॅट; स्मरणशक्तीचा वापर झाला कमी !
‘मोबाईल फास्ट’ संकल्पना राबवा
अमरावती : मोबाईल येण्याआधी प्रत्येकाला इतरांचे फोन क्रमांक तोंडी पाठ असायचे. आता मोबाईल मेमरीमुळे स्वत:चा सोडला तर कोणाचा नंबर लक्षात राहत नाही. स्वत:चे एकापेक्षा जास्त नंबर असतील, तर तेही लक्षात राहत नाहीत. मोबाईलमुळे आपल्या मेमरीवर परिणाम झाला आहे. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत नाही. स्मरणशक्तीचा वापर करीत नाही. त्याचे भविष्यात खूप वाईट परिणाम होऊ शकतात. वेळीच मुलांना पाल्यांना सुधारायला हवं. लॉकडाऊनच्या काळात तर मोबाईलचा वापर अधिक वाढला आहे. आबालवृद्ध त्यावर व्यस्त असल्याचे आढळून येते. हे योग्य नसून, त्याचे गंभीर परिणाम नजीकच्या काळात दिसतील, अशी भीती मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त हाेत आहे.
बॉक्स
हे टाळण्यासाठी...
एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मोबाईल, टीव्ही, संगणक अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे. त्याला ‘मोबाईल फास्ट (उपोषण)’ असे नाव द्यायचे.
मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे, मोबाईलवरील गेम नव्हे
पाठांतर करणे, स्तोत्र, मंत्र म्हणजे कविता, भाषण-संवादकला जोपासणे.
चिंतन, मनन करणे प्राणायाम योग व्यायाम करणे.
बॉस
असे का होते?
विचार करण्याची प्रक्रिया न करणे
आठवणी स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष
पाढे पाठ न करता कॅल्क्यूलेटर वापरणे
बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल
अस्थिरता, अस्वस्थता आणि चंचलता वाढणे
कोट
माेबाईलमुळे नवतंत्रावरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी सगळे सक्रिय जिवंत स्मृतीमध्ये साठवावे, याचे भान राहिले नाही. याकरिता निर्जीव यंत्राचा आधार लोक घेऊ लागले आहेत. स्मृती जिवंत आहे. मोबाईल मटेरियल आहे. आपली स्वत:ची जिवंत स्मृती साेडून मनुष्य यंत्राने साठवलेल्या स्मृतीवर विसंबून राहू लागला आहे. हे धोकादायक व तोट्याचे लक्षण आहे. यामधून मनुष्य आपले अपरिमित नुकसान करून घेत आहेत.
डाॅ. स्वाती सोनोने, मानसोपचारतज्ज्ञ
कोट
ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल मुलांच्या शैक्षणिक कार्यासाठी महत्वाचा घटक बनला आहे. याचे फायदे नव्हे, तर तोटेच अधिक दिसत आहेत. मेंदू हा यंत्राप्रमाणेच विचार करू लागला आहे. त्यामुळे मुलांची विचार क्षमता कमी होत आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर किंवा गणित सोडविणे हेसुद्धा मोबाईल पाहिल्याशिवाय होत नाही.
- मोहन बैलके, पालक
कोट
वयोमानानुसार स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. पण, मोबाईलमुळे ती अधिक क्षीण होते. आपण नैसर्गिकपणे काही गोष्टी डोक्यात साठवू शकतो. मग यंत्राची काय गरज आहे? आजही डायरीमध्ये फोन नंबर लिहून ठेवण्याची सवय कायम आहे.
- वामनराव फरकुंडे, ज्येष्ठ नागरिक