मेळघाटातील घाटात खटारा बसेस!
By Admin | Updated: May 20, 2016 00:12 IST2016-05-20T00:12:07+5:302016-05-20T00:12:07+5:30
मेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मेळघाटातील घाटात खटारा बसेस!
केव्हाही थांबतात चाके : टपाल बसच्या मनमानीने वर्तमानपत्रे उशिरा
श्यामकांत पाण्डेय धारणी
मेळघाटातील जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे एसटी महामंडळाच्या मनमानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एसटी महामंडळ जनतेच्या सेवेसाठी की, डोकेदुखी वाढविण्यासाठी, असा सवाल विचारल्या जात आहे.
शासनाला मेळघाटातील कुपोषण व रोजगार हमी योजना हे दोनच समस्या दिसते. त्यादृष्टीने या दोन समस्यांवर उपाययोजना केल्या की मग मेळघाटात काहीच करायची आवश्यकता नाही, असे गृहीत धरूनच प्रशासनिक कारभार सुरू आहे. राजकीय नेत्यांना मतदारसंघातील कामे कमिशनवर विकून मौज करण्यातच धन्यता वाटते. त्यामुळे येथील सामान्य जनता विविध समस्यांच्या विळख्यात भरडली जाते.
एसटी महामंडळातील सदोष बसगाड्यांची समस्या अनेक वर्षांपासून आहे. परंतु १०० किमीच्या घाटात नवीन गाड्या पाठविण्याऐवजी रिजेक्टेट गाड्या पाठविल्या जातात. त्यामुळे अनेकदा अशा भंगार गाड्यांना अपघात घडला आहे. मेळघाटातील जनप्रतिनिधीपेक्षा जास्त काळजी लगतच्या अचलपूर मतदारसंघातील आ. बच्चू कडू यांना असल्याचे दिसते. त्यांनी भंगार गाड्यांविरुद्ध आंदोलन करून आपल्या क्षेत्राला चांगल्या गाड्या लावून घेतल्यात. मात्र मेळघाटातील लोकप्रतिनिधींना येथील समस्यांची जाण असू नये ही खेदाची बाब आहे.
अमरावतीवरून सकाळी सहा वाजता टपाल गाडी धारणीकरिता सुटते. मात्र ही बस खासगी गाड्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ देते व नंतर आरामाने ११ वाजतापर्यंत प्रवास करते. आज तर ही गाडी आलीच नाही. त्यामुळे परत येणारे वर्तमानपत्र सायंकाळपर्यंत पोहोचले. लोकांना सकाळचे पेपर रात्री वाचायला मिळत आहे. यापेक्षा आणखी दुर्दैव दुसरे कोणते म्हणता येईल, याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.