मेळघाटचे विद्यार्थी गणितात उत्तम
By Admin | Updated: October 14, 2015 00:19 IST2015-10-14T00:19:58+5:302015-10-14T00:19:58+5:30
अतिदुर्गम मेळघाटमधील विद्यार्थी भाषेत अप्रगत असल्याचा निष्कर्ष डायटच्या पथकाने निरीक्षणाअंती नोंदविला आहे.

मेळघाटचे विद्यार्थी गणितात उत्तम
भाषेत अप्रगत : डायटचा निरीक्षणाअंती निष्कर्ष, मराठीचा गंंधही नाही
अमरावती : अतिदुर्गम मेळघाटमधील विद्यार्थी भाषेत अप्रगत असल्याचा निष्कर्ष डायटच्या पथकाने निरीक्षणाअंती नोंदविला आहे. मात्र, इयत्ता २ ते ८ चे हेच विद्यार्थी गणितात उत्तम असल्याचा निष्कर्षदेखील डायटने काढला आहे.
८ आॅक्टोबर रोजी ‘डायट’च्या प्राचार्यांच्या नेतृत्वात १५ जणांच्या पथकाने मेळघाटातील हतरू बिटमधील ३७ शाळांना भेटी दिल्यात. मेळघाटामधील विद्यार्थी नेमके कोठे कमी पडतात, यासाठी ही शोधयात्रा काढण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या नेतृत्वात साधनाशक्ती अधिव्याख्याता आणि विस्तार अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ३ शाळांमध्ये जाऊन इयत्ता २ ते ८ च्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाची चाचणी घेतली. त्यात पायाभूत चाचणीची पडताळणी आणि भाषा व गणिताचे श्रुतलेखन आणि अनुलेखन घेण्यात आले. मात्र, मराठी भाषा या विद्यार्थ्यांना समजत नसल्याने त्यांना अर्थबोध्द होत नसल्याचे निरीक्षण या पथकाने नोंदविले.
येथील विद्यार्थ्यांची बोलीभाषा कोरकू असल्याने हे विद्यार्थी शाळेत आणि परस्परांशी कोरकू आणि हिंदी भाषेत संवाद साधतात. मराठी भाषेचा अर्थबोध होत नाही, म्हणून शिक्षकही त्यांना हिंदीतून समजावून सांगतात. या विद्यार्थ्यांना मराठीचा गंधही नसल्याचे शाळा पाहणीदरम्यान आढळून आले. पायाभूत चाचणीच्या उत्तरपत्रिका तपासल्या असता त्यातही मराठी भाषेत हे विद्यार्थी अप्रगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मेळघाटात मराठी भाषेसाठी उपयुक्त वातावरण नाही. मात्र, हिंदी भाषेत समजावून सांगितल्यास त्यांना गणितामध्ये ‘ग्रीप’ मिळाल्याचे ‘डायट’चे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी सांगितले. ८ आॅक्टोबरला हतरू बिटमधील ३७ शाळांची पाहणी केल्यानंतर ९ आॅक्टोबरला या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची जारिदा आश्रमशाळेमध्ये प्रेरणा कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ‘डायट’च्या पथकाने उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापकांना पायाभूत चाचणीमागील भूमिका समाजावून सांगितली आणि वर्ग अप्रगत विद्यार्थीविहिन करण्याच्या सूचना दिल्यात. मेळघाटातील मुले भाषेत अप्रगत असली तरी २०१६ पर्यंत ही मुले अप्रगतकडून साधारण स्तरावर आणण्याचा विडा मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी उचलला आहे. यासाठी लवकरच एक उपक्रम राबविला जाणार आहे.
पायाभूत चाचणीतही साधारण
धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांतील इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात आली. या चाचणीत अनेक ठिकाणी गैरप्रकारही झालेत. पायाभूत चाचणीमध्ये येथील विद्यार्थी साधारण ठरले आहेत. त्यांची मातृभाषा कोरकू असल्याने शिक्षकही मराठीचा आग्रह न धरता हिंदी आणि कोरकू भाषेमध्ये शिकवतात. परिसरातही त्यांच्या कानावर मराठीचे शब्द एकिवास येत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी भाषेमध्ये अप्रगत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी उपक्रम राबविले जाणार आहे.