शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रग्रहण’२७ जुलै रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:07 IST2018-07-17T23:06:51+5:302018-07-17T23:07:36+5:30
शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे.

शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रग्रहण’२७ जुलै रोजी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शतकातील सर्वात प्रदीर्घ ‘खग्रास चंद्रगहण’ असा उल्लेख केल्या जाणारे ग्रहण संपूर्ण भारतात २७ जुलै रोजी दिसणार आहे. यावेळी चंद्र लाल तपकिरी दिसणार आहे. त्यामुळेच या चंद्राला खगोल वैज्ञानिकांनी ‘ब्लड मून’ असे नाव दिले आहे. या ग्रहणाचा स्पर्शकाळ ते मोक्ष या दरम्यानचा कालावधी सुमारे तीन तासांचा असेल. त्यापैकी ग्रहणाची खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटांची राहणार असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
भारतात २७ जुलै रोजी रात्री ११.५४ वाजता चंद्रग्रहण लागेल. २८ जुलैच्या पहाटे ३.४९ वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्र्रग्रहण घडून येण्यासाठी पौर्णिमेचा दिवस असावा लागतो व सूर्य - पृथ्वी-चंद्र या तीनही गोलांचे मध्य एका सरळ रेषेत आणि पातळीत असावे लागतात. चंद्र त्याच्या परिभ्रमण मार्गातून पृथ्वीच्या शंकुच्या आकाराच्या दाट सावलीतून जातो. त्यावेळी तो पूर्णपणे दिसेनासा होतो. याला ‘खग्रास चंद्रग्रहण’ असे म्हणतात. एका वर्षात कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन चंद्रग्रहण होतात. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे असतो. दर अमावस्येला किंवा पौर्णिमेला ग्रहण लागत नाही. यावेळी चंद्राची भ्रमणपातळी आयनिक पातळीशी ५ अंशांचा कोन करतो. पौर्णिमेला किंवा अमावस्येला चंद्र आयनिक पातळीच्या उत्तरेला किंवा दक्षिणेला असू शकतो. त्यामुळे सूर्य-पृथ्वी-चंद्र एका रेषेत येऊ शकत नाही, असे खगोल अभ्यासकांनी सांगितले.
२७ जुलैला मंगळ पृथ्वीच्या जवळ
मंगळ ग्रह हा २७ जुलै रोजी अगदी सूर्यासमोर राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर हे सरासरी कमी असते. पृथ्वीपासून मंगळ ग्रहाचे अंतर सरासरी १३ कोटी ६८ लक्ष ६७ हजार ६५७ कि.मी. आहे. परंतु प्रतियुती काळात हे अंतर ५ कोटी ७५ लक्ष कि.मी. राहील. सरासरी २६ महिन्यांनी सूर्य-मंगळ प्रतियुती असते. याआधी २२ मे २०१६ रोजी सूर्य - मंगळ प्रतियुती झाली होती. यानंतर ६ आॅक्टोबर २०२० रोजी मंगळ पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी मंगळ हे अंतर ६ कोटी २० लक्ष कि.मी. राहील.
आयर्न आॅक्साईडमुळे मंगळ ग्रह लाल
मंगळ ग्रहावर आयर्न आॅक्साईडचे प्रमाण अधिक असल्याने हे ग्रह नेहमी लाल दिसते. या ग्रहाला एकूण दोन चंद्र आहेत. मंगळाचा व्यास ६,७९५ कि.मी. आहे. याला सूर्यभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यास ६८७ दिवस लागतात. २० जुलै १९७६ आणि ६ आॅक्टोेबर १९७६ रोजी व्हायकिंग-१ आणि व्हायकिंग-२ या जुळ्या मानवरहित यानांनी मंगळाच्या मातीला प्रथम स्पर्श केला. या यानांनी जवळजवळ ११ महिन्यांचा प्रवास केला होता. २७ जुलै रोजी सूर्य मावळल्यावर लगेच पूर्व क्षितिजावर मंगळ ग्रह दिसेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह साध्या डोळ्यांनी रात्रभर पाहता येईल व हा लाल रंगाचा असल्याने सहज ओळखतादेखील येईल.
मानवी जीवनावर ग्रहणाचा परिणाम नाही
या विज्ञानयुगातसुद्धा ग्रहणासंदर्भात समाजात अनेक अंधश्रद्धा रुढ आहेत. अशा ग्रहणात जेवण करू नये, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, ग्रहण झाल्यावर आंघोळ करावी, ग्रहण झाल्यावर दान करावे, अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कुठेही आधार नाही. ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. सर्व खगोलप्रेमिंनी व जिज्ञासूंनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर, प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.