‘स्ट्रॉबेरी’ने उंचावले शेतकऱ्यांचे जीवनमान
By Admin | Updated: March 5, 2016 00:15 IST2016-03-05T00:15:24+5:302016-03-05T00:15:24+5:30
मेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला.

‘स्ट्रॉबेरी’ने उंचावले शेतकऱ्यांचे जीवनमान
मेळघाटात हरितक्रांती : ५०० लोकांना मिळाला रोजगार, रोज लाखोंची उलाढाल
मनीष कहाते अमरावती
मेळघाटमध्ये स्ट्रॉबेरीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविले आहे. ५० शेतकऱ्यांनी प्रत्येकी १० गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यामध्ये ५०० लोकांना रोजगार मिळाला. रोज लाखो रूपयांची उलाढाल याद्वारे होत आहे. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चिखलदऱ्याच्या स्ट्रॉबेरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी सुखावला आहे.
येथील शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या पुढाकाराने मेळघाटमधील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यामध्ये ५० शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास इच्छुक झाले. चिखलदरा तालुक्यातील मोथा येथील सर्वाधिक ३४ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. तेथील शंकर किसन निखाडे यांनी स्ट्रॉबेरीची लागवड आॅक्टोबर २०१५ मध्ये १० गुंठे शेतामध्ये केली. स्ट्रॉबेरी लागवडीआधी ते कोरडवाहू पिके घेत होते. त्यामध्ये त्यांना कधी १५ हजार रुपयांच्यावर उत्पन्न झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिन्यांच्या स्ट्रॉबेरीच्या लागवडीने आम्हाला लाखो रूपये कसे दिसतात ते पहायला मिळाले. आजपर्यंत ७० हजार रुपयांची स्ट्रॉबेरी विकली असून महिनाभरात तेवढीच निघणार असल्याचे त्यांनी सांगितले. आलाडोह, शहापूर, टेटू, आमझरी, खटकाली, सलोना, लोणादरा आदी ठिकाणी शेतात स्ट्रॉबेरीची लागवड झाली.
आलाडोह येथील नारायण खडके यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून आतापर्यंत एक लाख रुपयांची स्ट्रॉबेरी विकल्याचे त्यांनी सांगितले. चिखलदरा शहरात व आजूबाजूच्या गावांत स्ट्रॉबेरी स्टॉल विक्रीकरिता तेथील लोकांनी लावले. त्यामध्ये सुमारे ५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी शेतातच वजनकाटे लावून स्ट्रॉबेरीची विक्री सुरू केली आहे. रोजचा खर्च शेतकऱ्यांचा स्ट्रॉबेरीवर भागत असल्याचे गणेश शेळके स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्याने सांगितले. परिसरात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी अमरावती, परतवाडा, इंदौर, नागपूर, हैद्राबाद, मुंबई येथे विक्रीला नेल्याचे पान्डू शनवारे यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी कधी पाहली नाही. गहू, सोयाबीन, तूर, कापूस हेच आमचे कोरडवाहू पिके. परंतु यामधून खर्चाच्या मानाने उत्पन्न अतिशय कमी मिळत होते. परंतु उद्यानविद्या महाविद्यालयाच्या चमूने आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार कायमचा दूर केल्याचे साधुराम पाटील यांनी सांगितले.