गढूळ पाणी शुद्ध करण्यास जीवन प्राधिकरण अपयशी
By Admin | Updated: August 12, 2015 00:10 IST2015-08-12T00:10:34+5:302015-08-12T00:10:34+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गढूळ पाणी शुद्ध करण्यास जीवन प्राधिकरण अपयशी
तुरटी, क्लोरीनचे डोज वाढविले : शहरात सर्वत्र दूषित पाण्याचा पुरवठा
वैभव बाबरेकर अमरावती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्वच परिसरात गढूळ पाणी पुरवठ्यामुळे पोटाचे विकार वाढल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढली असून जीवन प्राधीकरण गढूळ पाणी शुध्द करण्यात उपयशी ठरले आहेत. हे वास्तव आजच्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराचे आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच स्थिती उदभवली असून पुन्हा जीवन प्राधिकरणाकडून गढूळ पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
गढूळ पाण्याबाबत तक्रारी घेऊन अनेकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दारे ठोठावली आहेत. मात्र, पाण्यात गढूळता नसून पाण्याचा केवळ रंग गढूळ दिसत असल्याची अफलातून उत्तरे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देत आहे. गढूळ पाण्याबाबत 'लोकमत' प्रतिनिधीने काही डॉक्टर व तज्ज्ञ मंडळीशी चर्चा केली आहे. त्यांनाही गढूळ पाणी असो किंवा गढूळ रंग असो, दोन्ही स्थितीतील पाणी मानवी शरीररासाठी घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या ८ ते १० लाखांच्या जवळपास आहे. शहरात जीवन प्राधिकरणाचे सुमारे ८० हजार ग्रांहक आहेत. दररोज नागरिकांना ९५ दशलशलिटरचा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शुध्द पाणीपुरवठ्याची हमी देणारे जीवन प्राधीकरण आजच्या आधूनिक युगात पाण्यातील गढूळताही नाहिसी करू शकत नाहीत, ही बाब आश्चर्याचीच आहे. शहरात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यातच जीवन प्राधीकरणाकडूनही गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे.
गढूळ पाण्यात हायड्राआॅक्साईड
व आयरन बॅक्टेरिया
विविध ठिकाणच्या पाण्यासोबत रासायनीक खतातील रसायन वाहत येऊन पाणी धरणात जमा होते. त्यामध्ये असलेल्या सल्फेट रसायनापासून हायड्राआॅक्साईड तयार होते. ते लवकर स्थिर होत नाही. त्यातच पाण्यात आयरन बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. ते मानवी शरिरासाठी घातक ठरते. धरणातील पाण्याचे शुध्दीकरण केल्यावरही हायड्राआक्साईड व आयरन बॅक्टेरियाचे काही प्रमाण कायमच असते. त्यामुळेच पाण्याचा रंग गढूळ होते. मात्र, पाण्यात गढूळता अधिक असल्यास पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख आ.श.अस्वार यांनी दिली.
गढूळ पाणी घेऊन नागरिकांची मजीप्राकडे धाव
शहरातील बहूतांश भागात नळाला गढूळ पाणी येत असल्यामुळे अनेक नागरिक गढूळ पाणी घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या दारे ठोठावत आहेत. मात्र, पाण्याला केवळ गढूळ रंग आहे, तो गढूळ रंग नाहिसा केला जावू शकत नाही, असे उत्तरे नागरिकांना देण्यात येत आहे. मंगळवारी भाजीबाजार परिसरातील विशाल गणोरकर यांनी बॉटलीत गढूळ पाणी घेऊन मजीप्रा अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यांनी आणलेल्या पाण्यात गढूळतेचे प्रमाण अधिक होते.