लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल
By Admin | Updated: May 13, 2015 00:36 IST2015-05-13T00:36:42+5:302015-05-13T00:36:42+5:30
सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत,

लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल
चांदूररेल्वे : सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत, त्याला चार हजार फुटाचे घर, ज्याच्या घरी १५ कुटुंब आहे त्याला दोन हजार फुटाचे घर ही मोठी दरी आहे. लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल, असे प्रतिपादन जनता दलाचे नेते पांडुरंग ढोले यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर झालेल्या घरकूलपात्र लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
चांदूररेल्वे नगरपरिषद अंतर्गत घरकूल योजना सुरू होऊन १५ वर्षे झालीत. गरिबांना घरकूल मिळावे ही संकल्पना असताना मागील १० वर्षांपासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थी यापासून वंचित राहिले आहे. त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनता दलाचे माजी आमदार पांडुरंग ढोले, आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी, भाकपचे विनोद जोशी, माकपचे रामदास कारमोरे, नगरसेवक मेहमुद हुसैन, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ भैसे यांची उपस्थिती होती.
आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी आपल्या भाषणात म्हटले की, नवीन सरकार दिशाभूल करीत आहे. याकडे जनतेने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाला घराची अपेक्षा आहे. ओबीसी व खुला प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुलाची योजनाच नाही. शहरात ११५० लोकांचे सर्वे केले. त्यांना घराची अत्यंत गरजेचे आहे. त्यांना घर मिळाले पाहिजे, असे म्हटले. यावेळी लाभार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांना घरकूल मागणीचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)