गत दोन वर्षांपेक्षा यंदा जुलैमध्ये कमी पाऊस
By Admin | Updated: July 21, 2015 00:27 IST2015-07-21T00:27:49+5:302015-07-21T00:27:49+5:30
यंदाच्या खरीप हंगामात १ जून ते २० जुलै दरम्यान केवळ २२८.३ मि.मी. पाऊस पडला.

गत दोन वर्षांपेक्षा यंदा जुलैमध्ये कमी पाऊस
कोरड्या दुष्काळाचे सावट : गतवर्षी जुलैमध्ये २५२ मि.मी. पाऊस
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात १ जून ते २० जुलै दरम्यान केवळ २२८.३ मि.मी. पाऊस पडला. त्या तुलनेत सन २०१४ मध्ये जुलैअखेर ४३६ मि.मी. पाऊस झाला. २० जुलैपर्यंत १८४.४ मि.मी., तर ३१ जुलैपर्यंत या ११ दिवसांत तब्बल २५२ मि.मी. पाऊस पडला आहे. सन २०१३ मध्ये ३१ जुलैपर्यंत पावसाची सरासरी ३५३ मि. मी. अपेक्षित असताना ६१३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. मात्र सन २०१४ मध्ये कोरडा दुष्काळ असतानाही यंदाच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने यंदाच्या खरीप हंगामावर कमी पावसाअभावी दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसते आहे.
यंदाच्या हंगामात २० जुलैपर्यंत पावसाची अपेक्षित सरासरी ३२४.४ मि. मी. असताना २२८.३ पावसाची नोंद झाली आहे. रविवार ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७.३ मि.मी. पाऊस पडला. यामध्येही धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्ये निरंक राहिले आहे. तिवसा तालुक्यात केवळ ०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र चिखलदरा तालुक्यात ४७.४ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली आहे.
गतवर्षी २०१४ मध्ये जून महिन्यात पावसाची सरासरी १४६ अपेक्षित असताना फक्त ५० मि.मी. पाऊस पडला होता. ही केवळ ३४ टक्केवारी होती. जुलै महिन्यात २७७ मि.मी. पाऊस असताना ३८६ मि.मी. पाऊस पडला होता, ही १३९ टक्के सरासरी होती. २० ते ३१ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाल्याने गतवर्षी जुलैअखेर पावसाची सरासरी वाढली होती.
सन २०१३ मध्ये जून महिन्यात पावसाची अपेक्षित सरासरी १४६ मि. मी. असताना ३०२ मि.मी. पाऊस पडला, ही २०७ टक्केवारी होती. तर जुलै महिन्यात २७७ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना ३११ मि.मी. पाऊस पडला होता, याची टक्केवारी ११३ इतकी होती.
या तीन वर्षांचा आढावा घेता २०१३ मध्ये जुलैअखेर झालेल्या ६१३ मि.मी. पावसाने पिके उद्ध्वस्त झाली होती. २०१४ मध्ये पावसाअभावी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. खरिपाची १५ नोव्हेंबरला ५० पैशांच्या आत पैसेवारी होती. तरीही यंदाच्या तुलनेत जुलैअखेर जास्त पाऊस होता. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ जुलैपर्यंत विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने यंदाच्या खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
२६ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता
मध्यप्रदेशवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत आहे. येथे ६ ते ८ कि. मी. उंचीवर चक्राकार वारे आहेत. पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालयावर चक्राकार वारे असल्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत २० ते २६ जुलैदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे.
रविवारी ७.३ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात रविवारी ७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक पाऊस चिखलदऱ्यात पडला. १९ जुलैपर्यंत पावसात माघारलेल्या या तालुक्याने एका दिवसात सरासरी भरून काढली आहे. धामणगाव, नांदगाव तालुका निरंक राहिला. अमरावती २.१, भातकुली ३.३, चांदूररेल्वे १.१, तिवसा ०.५, मोर्शी ७.५, वरूड ८.६, अचलपूर ५.५, चांदूरबाजार ५.९, दर्यापूर १.३, अंजनगाव ४.२, धारणी १४.७ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली.
चांदूररेल्वे तालुक्यात सर्वात कमी पाऊस
जिल्ह्यात १ जून ते २० जुलैदरम्यान २२८.३ पावसाची नोंद झाली. ही अपेक्षित सरासरीपेक्षा ९७ मि.मी. ने कमी आहे. सर्वात कमी १४३.७ मि.मी. पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात पडला आहे. धामणगाव १४९.१ मि.मी., दर्यापूर १.७८ मि.मी. चांदूरबाजार १८१ मि.मी. हे यंदा सर्वात कमी पाऊस पडलेले तालुके आहेत.