जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:19+5:302021-01-19T04:16:19+5:30
अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ
अमरावती: जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाची चांगली अंमलबजावणी करून जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
१८ जानेवारी ते १७ फेब्रवारी २०२१ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी राज्य शासनाच्या गृहविभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार संबंधित विभागाने करावयाच्या उपक्रमाची माहिती दिली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, उपविभागीय अभियंता आर. एस. वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद निरवणे, प्रभारी एसीपी (वाहतूक) राहुल आठवले, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एस. एम. फुरसुले, महापालिकेचे सहा. अभियंता लक्ष्मण पावडे, महाराष्ट्र राज्य वाहतूक व नागरी संरक्षण जिल्हा समादेशक सागरसिंह कनकुरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बॉक्स :
अशी जनजागृती करण्याचे निर्देश
शासनाच्या परिपत्रकानुसार चौक सभा घेणे, रस्ता सुरक्षाविषयक बॅनर्स लावणे, माहितीत्रके, हॅन्डबिल वाटप करणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, वाहनांना रिप्लेक्टर लावणे, ब्लॅक स्पोटची, खड्ड्याची दुरुस्ती करणे, शाळा- महाविद्यालयांमध्ये जनजागृती करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करणे, शाळा- महाविद्यालयांत जनजागृती करणे, वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचा समावेश करणे त्यामुळे अपघातांच्या व मृत्यूच्या संख्येत घट होईल व जीवितहानी टळेल.
बॉक्स : ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावा
रस्ता सुरक्षा अभियान राबविताना जिल्ह्याच्या सीमेवर जिल्ह्याची ऐतिहासिक महत्त्व पटवून देणारी फलके लावावेत, ज्या ठिकाणी जास्त अपघात होतात अशा ठिकाणावर तसेच टोलनाक्यावर आर्ट स्कुलपचरचा पुतळा उभारून त्याखाली रस्ता सुरक्षाविषयक घोषवाक्य लिहावित, अपघाताची आकडेवारी प्रसिद्ध करावी जेणेकरून ती वाहनचालकांच्या निदर्शनास येईल, असे निर्देश देण्यात आले असून वाहनचालकांनी जबाबदारीने वाहने चालवावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघातावर नियंत्रण मिळविता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.