कुलसचिवांना उशिरा सुचले शहाणपण
By Admin | Updated: August 23, 2014 23:42 IST2014-08-23T23:42:29+5:302014-08-23T23:42:29+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कुलसचिवांना उशिरा सुचले शहाणपण
खळबळ : कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती नोंदवहीकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे कुुलसचिवांना उशिरा शहाणपण सुचले, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वी कुलगुरु मोहन खेडकर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या लहरीपणावर बंदी लावण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. त्या अनुषंगाने कार्यालयीन सूचनेचे पत्र सर्व विभाग प्रमुखांना देऊन कर्मचाऱ्यांना सकाळी १०.३० वाजता सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहाण्याचे फर्मान सोडले होते. या सूचनेवरुन तोच धागा घरुन कुलसचिव डी. के. जोशी यांनी सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंद वहीची पाहणी सुरु केली आहे. त्यामुळे कुलसचिव स्वत:च उशिरा येतात. मात्र, तरीही कर्मचाऱ्यांकडून वेळेवर उपस्थित राहण्याची अपेक्षा करीत आहेत, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरु आहे. मागील काही वर्षांमध्ये विद्यापीठाच्या कार्यक्षमतेचा बोजबारा वाजल्याचे चित्र आहे. अनेक वेळा विद्यापीठाविरुध्द ताशेरे ओढले जात आहे. विद्यापीठाचे कुलगुरु यांच्यावर लागलेले विविध आरोप, कुलसचिवांचे कारनामे, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, आॅनलाईन प्रक्रिया, बिंदू नामावली प्रलंबित, पत्रकारावर वॉच, कर्मचाऱ्यांच्या अपमान, मराठी भाषकांचा अपमान, संगणक घोटाळा, विद्यार्थ्यांच्या समस्या अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात विद्यापीठ सापडले आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाचा कामकाज सुरळीत न झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता कुलसचिवांनी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले असून कर्मचाऱ्यांचे हजेरी नोंदवही तपासणी केली जात आहे.
मागील कित्येक वर्षांपासून आजपर्यंत कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. रिक्त पदे तसेच पद्दोन्नतीकडे अजूनही दुर्लक्षच आहे, अशा अनेक बाबींवर लक्ष वेधण्याचे सोडून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. विद्यापीठात कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे,हे विषेश. (प्रतिनिधी)