पतसंस्थेत अडकल्या लाखोंच्या ठेवी
By Admin | Updated: March 8, 2015 00:15 IST2015-03-08T00:15:31+5:302015-03-08T00:15:31+5:30
सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्याने यातून लक्ष्मी दर्शनासाठी आर्थिक वर्ष संपून पुन्हा एक वर्ष आणि तोही काळ पूर्ण झाला म्हणून चार महिने अधिक वाढविण्यात आल्याची माहिती आहे.

पतसंस्थेत अडकल्या लाखोंच्या ठेवी
वरूड : सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्याने यातून लक्ष्मी दर्शनासाठी आर्थिक वर्ष संपून पुन्हा एक वर्ष आणि तोही काळ पूर्ण झाला म्हणून चार महिने अधिक वाढविण्यात आल्याची माहिती आहे. निंबंधकांच्या तक्रारी आणि त्यावर चौकशी होऊनदेखील ते एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने सहकाराचा स्वाहाकार होत आहे. सहकार क्षेत्रावर दुर्लक्ष असल्याने सेवा सहकारी संस्था, सावकार धास्तावले आहेत. यामुळे निंबधकांच्या बदलीची मागणीची चर्चा आहे. अवसायनात निघालेल्या पतसंस्थांमध्ये असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी कधी परत मिळणार, असा सवाल ठेवीदार उपस्थित करीत आहेत.
तालुक्यात पतसंस्थांचा महापूर आला असून ३४ पतसंस्था आहेत. सेवा सहकारी सोसायटी, सहकारी बँका आहेत. थकीत कर्जदारावर वसुलीकरिता खटले भरण्याकरिता दाखला घ्यावा लागतो. परंतु तोही सहजासहजी मिळत नसल्याचे पतसंस्थाचालाकडून सांगितले जाते. खातेदार व सभासदांना कर्ज वाटप केले जाते. परंतु वसुलीच्या वेळी जप्त पथके आणि मानहानी होईल, असे कृत्य पतसंस्थांकडून केले जाते. याकरिता सहायक संस्था निबंधकसुध्दा दक्षिणा घेऊन कार्यवाही करण्यास भाग पाडतो. अनेकांच्या अंकेक्षणात त्रुट्या असल्या तरी देवाणघेवाण करुन व्यवस्थित दाखविण्यात येत असल्याची चर्चा आहे. कर्जदारांना या निबंधकाकडून कार्यवाहीचे आदेश घेऊन त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. शेंदूरजनाघाटच्या दोन पतसंस्था अवसानायात निघाल्या असतानासुध्दा लाखो रुपये ठेवीदारांचे अडकले. या चिंतेने काही ठेवीदारांचा बळी गेला. वसुलीच्या दाखल्याकरिता रक्कम मोजावी लागत असल्याचे एका संस्था चालकाने सांगितले. नुकत्याच सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरु आहेत. निवडणूक काळात अनेक प्रकारचे खोटी बिले तसेच खोटी माहिती लावून खर्च सेवा सोसायटीच्या माथ्यावर पडतो. एकीकडे सहकारी संस्था डबघाईस आल्या परंतु निवडणुकीचा नाहकचा खर्च करावा लागतो याचा भुर्दंड सभासदांवर पडतो. आमसभेत किंवा कुणीही व्यक्ती तक्रार केल्यास कार्यवाहीच होत नसल्याचे संचालकाकडून सांगितले जाते. मात्र वरिष्ठ म्हणतात, तक्रारी द्या, त्यानंतर पाहू. सहमतीने ठरविण्याचा घाट सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बांधला असल्याची चर्चा असून भ्रष्टाचाराने तोंड वर काढले आहे. यामुळे वरिष्ठ अधिकारी, मंत्री याकडे लक्ष देणार काय, असा सवाल केला जात आहे. सहायक संस्था निबंधकाने काही महिन्यांपूर्वी सावकारांवर दबाबतंत्राचा वापर करुन रक्कम उधळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. निनावी तक्रार उपसंचालक सहकार विभागाला पाठविली होती. यामध्ये निबंधकाचा प्रतापच वर्णीला होता. तक्रारीवरुन येथील निबंधकाची चौकशी करण्यात आली. ही चौकशी एका निबंधकाला दिली होती. चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असला तरी वरिष्ठांचे पाठबळ असल्याने वरुडचा संस्था निबंधक येथे पाळेमुळे रोवून आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या कामावर तालुक्यातील नागरिक. ठेवीदार, कर्जदारसुध्दा नाराज असून सहकार क्षेत्राचा स्वाहाकर करणाऱ्या या अधिकाऱ्यावर आता सहकार मंत्रालयालयानेच कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील जागरूक नागरिक, संस्थाचालक करीत आहेत. वादग्रस्त सहाय्यक संस्था निबंधकांना हटविण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या संपत्तीची चौकशी करुन कारवाईची मागणीही केली आहे. (तालुका प्रतिनिधी)