सक्तीने वीजबिल वसूल केल्यास कार्यालयात कोंडू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:54+5:302021-01-24T04:05:54+5:30
युवा स्वाभिमानचा इशारा : महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव अमरावती: कोरोना कालावधीत आलेले वीजबिल ५० टक्के माफ करून वीज ग्राहकांना ...
युवा स्वाभिमानचा इशारा : महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
अमरावती: कोरोना कालावधीत आलेले वीजबिल ५० टक्के माफ करून वीज ग्राहकांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी करत, अधिकाऱ्यांनी सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याच्या कार्यालयात कोंडू, असा इशारा युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
२०२०मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे देशासह राज्यातील जनता हैराण झाली होती. अनेकांचे रोजगार गेले, परंतु या संकटाच्या काळात वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेसाठी विद्युत वितरण कंपनीद्वारे ग्राहकांना अवाजवी वीज देयके दिल्यामुळे नागरिकांना चांगलाच धक्का बसला. विशेष म्हणजे, राज्य सरकारने दिवाळीच्या आधी वीज ग्राहकांचे ५० टक्के वीज बिल माफ करून ग्राहकांना गोड बातमी देणार, अशी जाहीर घोषणा केली होती. याबाबत अनेकदा बैठका होऊन चर्चाही झाली, परंतु अजूनपर्यंत राज्य सरकारने कोणत्याही घोषणाची पूर्तता न केल्यामुळे जैसे थे बिल आकारण्यात येत आहे. राज्य सरकारने वीजबिलाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, तसेच आपले दुप्पटी धोरण न वापरता, राज्यातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी युवा स्वाभिमानने शुक्रवारी निवेदनाद्वारे महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. यावेळी युवा स्वाभिमानचे पदाधिकारी नीलेश भेंडे, पराग चिमोटे, रवी अडोकार, सद्दाम हूसैन, आकाश राजगुरे, रोशनी खेडकर, विशाल निघोंट, शुभम लांडे, अर्जुन दाते, शेख ऐजाज, अक्षय देशमुख, समीर डोंगरे, राम अहेरवार, रोहीत थोरात, अरबजा खान, दानिश हूसैन, मो.सोहेल, कुणाल आरके आदी उपस्थित होते.