'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 06:51 PM2024-05-27T18:51:00+5:302024-05-27T18:53:47+5:30

छगन भुजबळ यांनीही भाजपच्या घोषणेमुळे निवडणुकीत फटका बसल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ab ki bar 400 paar slogan damaged NDA in elections says chhagan bhujbal | 'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

Chhagan Bhujbal ( Marathi News ) : यंदाची लोकसभा निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजली. या निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या 'अब की बार, चारसो पार' या घोषणेचीही मोठी चर्चा झाली. मात्र देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज झाल्याची चर्चा रंगत होती. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही 'अब की बार, चारसो पार' या घोषणेचा निवडणुकीत आपल्याला फटका बसल्याची कबुली दिली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "मला आपल्याला सांगायचंय की, आधीच चारशे पार...चारशे पार ही घोषणा देण्यात आली आणि संविधान बदलणार हे दलित समाजाच्या मनावर इतके बिंबले की ते काढता काढता नाकी नऊ आले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका टीव्ही मुलाखतीत १५ ते २० मिनिटं हेच सांगत होते की आम्ही संविधान बदलणार नाही, उलट संविधान दिन साजरा करणार आहोत. मात्र या सगळ्याचा परिणाम आपल्याला आताच्या निवडणुकीत जाणवला. हे संपत नाही तोच आता मनुस्मृतीचा विषय समोर आला आहे. शाळांमध्ये मनुस्मृतीतील काही गोष्टी अभ्यासक्रमात येणार, अशी चर्चा सुरू आहे. मनुस्मृती म्हटलं की झालं मग कल्याण! वर्णव्यवस्था मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळली आहे. असं असताना आता पुन्हा कोणीतरी हे विषय वर काढत आहे," अशा शब्दांत भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

दरम्यान, आतापर्यंत विरोधकांकडून 'अब की बार चारसो पार' या भाजपच्या घोषणेचा समाचार घेतला जात असताना आता महायुतीत असणाऱ्या छगन भुजबळ यांनीही या घोषणेमुळे निवडणुकीत फटका बसल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भुजबळांकडून जागावाटपावरही भाष्य

"विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत," अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Web Title: Ab ki bar 400 paar slogan damaged NDA in elections says chhagan bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.