बच्चू कडूंचा झेडपीत ठिय्या
By Admin | Updated: September 4, 2016 00:16 IST2016-09-04T00:13:21+5:302016-09-04T00:16:29+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत सन २००७-०८ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.

बच्चू कडूंचा झेडपीत ठिय्या
आंतरजिल्हा बदल्याचा मुद्दा : आश्वासनानंतर माघार
अमरावती : जिल्हा परिषदेअंतर्गत सन २००७-०८ पासून शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे शनिवारी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या दालनात ठिय्या देऊन तातडीने कारवाईची मागणी केली.
सन २०१०-११ मध्ये २९३ रिक्त पदांचा बनावट अहवाल दाखवून सरळ सेवा भरतीने शिक्षकांची नियमबाह्य २४८ पदे भरणे ही बाब भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असल्याचे स्पष्ट करीत आ. कडू यांनी आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली आंतरजिल्हा बदली प्रक्रिया व झालेली शिक्षक पदांची नियमबाह्य भरतीची कायदेशीर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, रखडलेली बदलीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, राज्यपाल यांची अधिसूचना ५ मार्च २०१५ च्या पेसा कायद्यान्वये आदिवासी क्षेत्रातील शिक्षक संवर्गाची मंजूर १ हजार ४०० पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या (एस.टी) उमेदवारांमधून भरावयाची आहेत. त्यामुळे ही पदे भरण्यास बराच अवधी लागणार आहे. त्यामुळे पदभरती होईपर्यंत आंतरजिल्हा बदलीने ही पदे तात्पुरत्या स्वरूपात या शिक्षकांना सामावून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, रिक्त पदांवर आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांना बुलडाणा जि.प.ने केलेल्या प्रक्रियेच्या धर्तीवर सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी सीईओंच्या दालनात ठिय्या दिला. दरम्यान प्रहार आंदोलन मागे घेण्यात आले. याशिवाय शिक्षण विभागाने चक्क कोमात गेलेल्या शिक्षकांची व एका अपंग शिक्षकांची मेळघाटात नियमबाह्य बदली केल्याचाही नमुना सीईओंच्या निदर्शनास आणून दिला. पालघटरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्यापही वस्तीशाळा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी महेश ठाकरे, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, चंदू खेडकर, वडस्कर, स्मिता पानझाडे, अविनाश मेश्राम, दिलीप धोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीर्ण वर्गखोल्यांच्या बांधकामास प्राधान्य द्या!
शिक्षण विभागामार्फत जीर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करण्यासाठी कुठलेही नियोजन नाही. त्यामुळे भातकुली तालुक्यातील आष्टी शाळेतील वर्गखोल्या धोकादायक आहेत. मात्र अशा ठिकाणी प्राधान्य न देता. सदस्य व पदाधिकारी यांच्या मर्जीनुसारच खोल्यांचे बांधकाम केले आहे. हा प्रकार चुकीचा असून यापुढे अत्यावश्यक असलेल्या शाळांत खोल्या बांधण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे आणि ज्याही वर्गखोल्यांचे बांधकाम सध्या सुरू आहेत, तेथे विशेष पथक स्थापन करून खरच वर्गखोली बांधकामाची गरज होती काय, याची पडताळणी करावी, अशी विचारणा आ.कडू यांनी केली.
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार सुरू आहे. एकीकडे राज्यात भाजप सरकारला सभागृहात शिक्षणाच्या मुद्यावर धारेवर धरणाऱ्या कॉग्रेसची सत्ता झेडपीत आहे. याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष आहे.
- बच्चू कडू, आमदार, अचलपूर
आंतरजिल्हा बदल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार योग्य कारवाईच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी दर महिन्याला बैठक घेतली जाईल.
- किरण कुलकर्णी, सीईओ झेडपी