वरुड तालुक्यातील खरीप पिके 'आॅक्सिजन'वर

By Admin | Updated: August 23, 2014 23:43 IST2014-08-23T23:43:27+5:302014-08-23T23:43:27+5:30

तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले आहे.

In Kharif crops of Varud taluka, on 'Oxygen' | वरुड तालुक्यातील खरीप पिके 'आॅक्सिजन'वर

वरुड तालुक्यातील खरीप पिके 'आॅक्सिजन'वर

वरूड : तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पाऊस नसल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संत्रा, कपाशी, मिरची, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके आॅक्सिजनवर आहेत. संत्र्याचा आंबिया बहर अति तापमानामुळे गळू लागला आहे.
यंदा आधीच उशिरा पेरणी करुनही पुन्हा कपाशी, मिरची, तूर, सोयाबीन, ज्वारीची पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. ओलिताखाली असलेल्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी कृषि पंपाव्दारे सिंचन करुन पिके जगविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सुखी समृध्द विदर्भाच्या कॅलिफोर्नियावर अस्मानी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांसह संत्रा उत्पादकही हवालदिल झाला आहे. अज्ञात विषाणूजन्य रोग आणि अतितापमानाचा फटका संत्रा आंबिया बहराला बसल्याने संत्रा फळे पिवळी पडत आहेत. शेतात संत्रांचा सडा पडला आहे. परंतु कृषी तज्ज्ञांमार्फत पाहिजे तशी उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. राजुराबाजार, लोणी, हातुर्णा, पुसला, सावंगी, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बेनोडा परिसरात गत अनेक दिवसापांसून पावसाने दडी मारली आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने जमिनी कडक आल्याने मशागतीला अडथळा निर्माण झाला आहे. पावसाअभावी हिरवे कुरणसुध्दा दिसत नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐन पावसाळ्यात निर्माण झाला. पांढरा सोनं म्हणून ओखले जाणाऱ्या कपाशीचेसुध्दा अस्तित्व धोक्यात आल्याने कपाशीच्या उत्पदनात घट होण्याची शक्यता आहे.
संत्रा आंबिया बहर घेतलेल्या शेतकऱ्यांनासुध्दा संत्रा गळतीमुळे लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मृगामध्ये पाऊस आला नसल्याने संत्रा मृग बहर फुटलाच नाही. यामुळे ५० टक्क्यांपेक्ष अधिक संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. पीककर्ज तसेच वैयक्तिक कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. तालुक्यातील दुष्काळग्रस्त स्थितीचा परिणाम बाजारपेठेवरसुद्धा झाला असून यंदा शेंदूरजनाघाटच्या पोळयाच्या बाजारावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: In Kharif crops of Varud taluka, on 'Oxygen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.