सहाशे किमी प्रवास करून पुण्याची मैना अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:42 IST2017-08-16T22:39:48+5:302017-08-16T22:42:02+5:30

लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रकमधून अनावधानाने मैनेचे घरटे तब्बल साडेपाचशेपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करून शहरात दाखल झाले.

The journey of 600 km is in Amravati in Manna | सहाशे किमी प्रवास करून पुण्याची मैना अमरावतीत

सहाशे किमी प्रवास करून पुण्याची मैना अमरावतीत

ठळक मुद्देजखमी पिलास जीवदान : राघवेंद्र नांदेंनी दिली मातृत्वाची उब

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोखंडी साहित्याने भरलेल्या ट्रकमधून अनावधानाने मैनेचे घरटे तब्बल साडेपाचशेपेक्षा अधिक किलोमीटरचा प्रवास करून शहरात दाखल झाले. प्रवासाच्या धक्काबुक्कीत घरट्यातील एक पिलू वाटेतच दगावले. दुसरे मात्र सुदैवाने जिवंत होते. ट्रक रिकामा करीत असताना एका व्यक्तिच्या लक्षात ही बाब आली. त्याचे मन द्रवले. पिलाची जीवंत राहण्याची तगमग त्याला अस्वस्थ करून गेली आणि त्याने ते पोरके पिलू पक्षीमित्र राघवेंद्र नांदे यांच्याकडे आणून दिले. आश्चर्य म्हणजे नांदे यांच्याकडून मिळालेली सुश्रुशा आणि मातृत्वाच्या उबेमुळे आता मरणपंथाला लागलेल्या त्या पिलाला बरीच उभारी मिळाली आहे. इवल्या-इवल्या पंखांची फडफड करण्याइतपत त्याची प्रकृती सुधारली आहे.
गोष्ट तशी छोटीच. पण, अपघातातील जखमींना इस्पितळात नेण्याऐवजी ‘फोटोसेशन’ करण्यात व्यस्त असलेले लोक आपण पाहतो. या पार्श्वभूमिवर इवल्याशा पक्ष्याचा जीव वाचविण्याकरिता सुरू असलेला हा खटाटोप पाहून अद्याप माणुसकी जीवंत असल्याची खात्री पटते. एकूण घटनाक्रम असा की, पुण्याहून स्थानिक जाधव इंडस्ट्रीजमध्ये लोखंडी साहित्य मागविले गेले. ट्रकने या साहित्याचा अमरावतीचा प्रवास सुरू झाला. अनावधानाने मैनेचे एक घरटेही ट्रकमध्ये भरले गेले. या घरट्यात दोन पिले होती. मात्र, ही बाब तेव्हा कोणाच्याच लक्षात आली नाही. त्यामुळे पिले सुद्धा हेलकावे खात व प्रवासाची दगदग सोसत अमरावतीपर्यंत कसेबसे पोहोचले.
मृत्यूच्या दाढेतून पिल्लू बाहेर
पण, दुर्देवाने त्यातील एका पिलाला ही दगदग सोसवली नाही आणि त्याचा मृत्यू झाला. सुदैवाने ट्रक रिकामा करताना ३० जुलै रोजी कुणाल रघुवंशी नामक व्यक्तिला दुसरे पिलू जीवंत असल्याची बाब त्याच्या लक्षात आली. ते पिलू जगावे असे मनापासून वाटल्याने त्याने तत्काळ ते पिलू पक्षीमित्र व वन्यजीव अभ्यास राघवेंद्र नांदे यांच्याकडे नेऊन दिले. योग्य सुश्रुषा व देखभालीने आजवर हजारो पशू-पक्ष्यांचे प्राण वाचविणाºया नांदे यांनी मैनेच्या त्या पोरक्या पिलाला आस्थेने जवळ घेतले. त्याची जबाबदारी स्वीकारली. आईच्या पंखांची उब हरविलेल्या त्या पिलाला त्यांनी मायेची उब दिली. त्याच्या इवल्याशा चोचीतून द्रव पदार्थ दिले, औषधींचा डोजही दिला. दीर्घ प्रवासात उपाशी राहून शिणलेल्या त्या इवल्याशा मांसाच्या गोळ्याला त्यांनी वरण-भात, खिचडी, केळी आदी भरवले. यामुळे आता मैनेच्या त्या मरणासन्न पिलाला बरीच हुशारी आली आहे. ते आता डोळे किलकिले करते, इवल्याशा पंखांची फडफड करते. स्वत: खाण्याचा प्रयत्नही करते. त्याची ही प्रगती समाधानकारक आहे. मृत्युच्या दाढेतूनच हे पिलू बाहेर निघाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पशू-पक्षी संवर्धनाचा असाही ‘वसा’
राघवेंद्र नांदे. हे नाव अमरावतीकरांना नवीन नाही. पशू-पक्ष्यांसाठी संपूर्ण जीवन वाहून घेतलेली ही व्यक्ती प्राणी-पक्ष्यांच्या संगतीतच रमते. पुण्याहून चुकून अमरावतीत आलेल्या मैनेच्या त्या पोरक्या पिलालाही त्यांनी जीवदान दिले. आईकडून आणलेल्या अळ्या खाऊन उंच आकाशात भरारी घेणाºया या मैनेच्या पिलाला ते शाकाहारी अन्न भरवितात. ग्लुकोज, टॉनिकसह डाळ अधिक घालून केलेली खिचडी ते त्याला देतात. आता हे पिलू सावरले आहे. दर अर्ध्या तासाने ते एक विशिष्ट आवाज काढते. तीन-ते चार शेंगदाण्यांइतके घास ते खाते. आता त्याच्या गुळगुळीत अंगावर पिसारा येऊ लागलाय. राघवेंद्र नांदेंनी केलेल्या सुश्रुशेचाच हा परिणाम आहे.

Web Title: The journey of 600 km is in Amravati in Manna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.