इर्विनची रुग्णसेवा ‘आजारी’
By Admin | Updated: June 23, 2014 23:39 IST2014-06-23T23:39:08+5:302014-06-23T23:39:08+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा, परिचारिकांची रिक्त पदे व बंद असलेले सिटी स्कॅन, लिफ्टमुळे एकूणच रूग्णसेवा कोलमडली आहे.

इर्विनची रुग्णसेवा ‘आजारी’
अमरावती : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा, परिचारिकांची रिक्त पदे व बंद असलेले सिटी स्कॅन, लिफ्टमुळे एकूणच रूग्णसेवा कोलमडली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असताना लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्याच्या रुग्णसेवेचा भार सांभाळणाऱ्या इर्विनमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने आरोग्य सेवा देताना दमछाक होत असल्याचे येथे चित्र आहे. वर्ग-१ चे १५ पदे रिक्त आहेत. मात्र हे रिक्त पदे भरण्यासाठी एकाही आमदारांनी प्रयत्न केला नसल्याचे उद्भवलेल्या परिस्थितीवरुन स्पष्ट होते. रिक्त पदांची भरती करण्यासंदर्भात मंत्रालयातील आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करुन इर्विनचे प्रशासन हतबल झाले आहे. दररोज ८०० ते ९०० बाह्यरुग्ण तपासणी तर वॉर्डात ३५० ते ४०० रुग्णसेवा दिली जाते. मात्र तोकडे मनुष्यबळ असल्याने येथील प्रमुखांना रुग्णसेवा कशा पुरवाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टॉप नर्स व अधिपरिचारिका या पदांचा अनेक वर्षांपासून वानवा असल्याची माहिती आहे. अधिपरिचारिकांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य सेवा देणे दुरापास्त झाले आहे. अशातच आरोग्य उपसंचालक कार्यालयाने ३० मुख्य परिचारिकांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र या बदल्यांच्या रिक्त जागी ३० ऐवजी ८ जागांवरच मुख्य परिचारिका कार्यरत आहेत. उर्वरित जागांवर मुख्य परिचारिकांच्या नियुक्तीचे आदेश करण्यात आले नाही. परिणामी आरोग्य सेवा आजारी पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वर्ग -३ ची २० पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजही डबघाईस आले आहेत. इर्विनमध्ये रुग्णसेवेबाबत निर्माण झालेली भीषण परिस्थिती आणि मनुष्यबळाच्या रिक्त जागांबाबत कोणीही राजकीय पुढारी सहकार्य करीत नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी येथून बदली करण्यासाठी मंत्रालयात ‘फिल्डिंग’ लावल्याचे बोलले जात आहे. मात्र अमरावतीत जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कोणीही येण्यास उत्सूक नाही. परिणामी रुघुनाथ भोये यांच्या बदलीचा आरोग्य विभागात मुहूर्त निघत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
इर्विनमध्ये उत्तम आरोग्य सेवा मिळावी ही सर्वच लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे. मात्र, येथे निर्माण झालेली दयनीय परिस्थिती कोण सुधारणार हा सवालसुध्दा उपस्थित होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात इर्विनच्या आरोग्य सेवेबाबत ठोस निर्णय होईल, अशी दाट शक्यता होती. मात्र जिल्ह्याच्या नशिबी आरोग्य सुविधेबाबत निराशाच आल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून सीटी स्कॅन मशीन बंद आहे. आपत्कालीन आरोग्य सेवा देताना बंद सीटी स्कॅन मशीनमुळे डॉक्टरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. केवळ बीपीएलच्या रुग्णांसाठी विशेष बाब म्हणून खासगी रुग्णालयातून सीटी स्कॅनची सोय केली जाते. मात्र येथील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने अन्य रुग्णांना ही सेवा घेताना खासगी रुग्णालयातून आगाऊ रक्कम मोजावी लागते, हे खरे आहे. बंद असलेले सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करणे शक्य नसल्याने त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने ही सुविधा देण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पुढे आणला. मात्र हा प्रस्ताव कुठे अडकला हे शोधण्याचे सौजन्य देखील आमदारांनी दाखविले नाही, त्यामुळे रुग्णसेवेबाबत लोकप्रतिनिधी किती सजग आहे, हे स्पष्ट होते.