लोखंडी नामफलक गायब
By Admin | Updated: December 7, 2014 22:41 IST2014-12-07T22:41:27+5:302014-12-07T22:41:27+5:30
राज्य महामहामार्गावर दिशादर्शक, सूचना, मार्गदर्शनासाठी लावण्यात आलेले लोखंडी नामफलक चोरणारी टोळी संपूर्ण विदर्भात सक्रिय झाली आहे. बहुतांश मार्गांवरील नामफलक गायब झाले असून

लोखंडी नामफलक गायब
राज्य महामार्गावरील घटना : बऱ्हाणपूर, अमरावती, वाशिम विक्रीचे केंद्र, विदर्भात टोळी सक्रिय
गणेश वासनिक - अमरावती
राज्य महामहामार्गावर दिशादर्शक, सूचना, मार्गदर्शनासाठी लावण्यात आलेले लोखंडी नामफलक चोरणारी टोळी संपूर्ण विदर्भात सक्रिय झाली आहे. बहुतांश मार्गांवरील नामफलक गायब झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला लाखोंचा फटका बसला आहे. राज्य महामार्गावर हे लोखंडी नामफलक नसल्याने चालकांना मार्गदर्शनाअभावी वाहने चालविण्याचा प्रसंग ओढवत आहे.
राज्य महामार्गाची देखरेख, दुरुस्ती, नूतनीकरण किंवा नवीन रस्ता निर्माण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्य शासनाने सोपविली आहे. रस्त्याचे जाळे विणताना हे रस्ते चांगल्या दर्जाचे निर्माण व्हावेत, यासाठी राज्य महामार्गाशी प्रत्येक रस्ते जोळणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. विदर्भात राज्य महामार्गाच्या रस्ते निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. राज्य महामार्गावर दर अर्धा कि.मी. च्या फरकाने वाहन चालकांना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे माहितीचे लोखंडी नामफलक लावण्यात आले आहेत. रस्ते निर्मिती करताना निविदा प्रक्रियेतच लोखंडी नामफलक लावण्याचे नमूद असल्यामुळे ठिकठिकाणी कंत्राटदाराकडून हे नामफलक लावून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांची आहे. त्यानुसार राज्य महामार्गावर लावण्यात आलेले हे लोखंडी नामफलक अचानक गायब झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतेही चक्रावून गेले आहेत.
चोरट्यांनी बनविले 'टार्गेट'
तीन ते चार महिन्यापूर्वी राज्य महामार्गावर लावण्यात आलेले दिशादर्शक, मार्गदर्शक लोखडी नामफलक चोरीस जात असताना या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार नोंदविली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य महामार्गावरील लोखंडी नामफलक चोरीस जात असल्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. लोखंडी नामफलक चोरीवरच हे चोरटे थांबले नाहीत. तर पुलाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले लोखंडी पाईपही कटरने कापून नेण्याचा सपाटा चालविला आहे. राज्य महामार्गावरील पूल हे सध्या संरक्षणविना उभे आहेत. एखाद्या प्रसंगी या पुलांवर अपघाताची घटना घडल्यास ती वाहने सरळ पुलाखाली गेल्याशिवाय राहणार नाही, अशी विदारक स्थिती राज्य महामार्गाची आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते निर्मिती केली जात असताना या रस्त्यांचे संरक्षण होत नसल्याचे वास्तव आहे. विदर्भात चोरी करणारी ही टोळी विशिष्ट व्यक्तीकडे नामफलकाची विक्री करीत असल्याची माहिती आहे. अमरावती, वाशीम व बुऱ्हानपूर येथे चोरी केलेले नामफलक विक्री होत असल्याची विश्वसनीय आहे.