लाल्या रोगाचे आक्रमण, शेतकरी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 00:17 IST2016-10-10T00:17:02+5:302016-10-10T00:17:02+5:30
संततधार पाऊस अन् लाल्या रोगाचे कपाशी पिकावर झालेल्या आक्रमणाने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

लाल्या रोगाचे आक्रमण, शेतकरी हैराण
शेतकऱ्यांची दैना : पऱ्हाटी सुकली, पाने गळली, उरले फक्त बोंड
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
संततधार पाऊस अन् लाल्या रोगाचे कपाशी पिकावर झालेल्या आक्रमणाने तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तालुक्यांतर्गत येत असलेल्या मांजरी म्हसला येथील शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीचे पीक पूर्णत: वाळून गेले असून पान गळली अन् पऱ्हाटीला फक्त बोंडंच शिल्लक राहिल्याने या शेतकऱ्याला दोन लाखांचा फटका बसला आहे.
तालुक्यांतर्गत येत असलेल्या मांजरी म्हसला येथील शेतकरी मनदेव चव्हाण प्रतिवर्षी दोन ते तीन एकरांत अडीच ते तीन लाखांचे कापूस उत्पादित करतात. त्यामुळे कापून उत्पदानासाठी लागणाऱ्या ना ना प्रकारचे उपाय ते नित्यनेमाने करतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी निंदण-खुरपणापासून डवरणी, विविध प्रकारच्या खतांचा डोस व कीड नाशक फवारणीचा प्रयोग केला. त्यामुळे पीक वाढीसाठी खर्चसुद्धा बराच झाला. शेतात राबराब राबून हाडाचं काड अन् रक्ताचे पाणी करणाऱ्या या शेतकऱ्याला यावर्षी मात्र कपाशी पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण अन् संततधार पावसाने दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
शेतातील ऐन जोमात असलेले पीक क्षणार्धात हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खर्चही वाया गेला अन् पीकही नष्ट झाल्याने या शेतकऱ्यासमोर फार मोठी आर्थिक विवंचना निर्माण झाली आहे. या शेतकऱ्याजवळ चार एकर शेती असून अडीच एकरांत कपाशी व दीड एकरात सोयाबीन पिकाची पेरणी त्याने केली होती. परंतु सोयाबीनलासुद्धा संततधार पावसाने कोंब फुटू लागल्याने फार मोठ्या आर्थिक समस्येचा डोंगर या शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.
आठवडा उलटल्यानंतरही अधिकारी फिरकेना
शेतातील पीक नष्ट झाल्याने अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला. परंतु अद्यापपर्यंत तलाठी, मंडळ अधिकारी यापैकी कुणीच शेतातील पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता न आल्याने प्रशासनाला शेतकऱ्याची दैना दिसत नसल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकरी मनदेव चव्हाण यांनी बोलून दाखविली.