संस्थात्मक विलगीकरण, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST2021-02-17T04:18:41+5:302021-02-17T04:18:41+5:30
अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष ...

संस्थात्मक विलगीकरण, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा
अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याच्या स्थितीबाबत नवाल यांनी माहिती सादर केली. या कॉन्फरन्सनंतर जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी, दिलीप रणमले यांच्यासह महापालिका, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून दक्षतेचे नियम पाळले न जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे गृह विलगीकरणाऐवजी आता संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्रे सुरू करण्यात येतील. व्हीएमव्ही महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटर तत्काळ सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे वलगाव व नजीकच्या ठिकाणी कार्यरत आरोग्य कर्मचा०यांसाठी नवसारी येथे निवास व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले.
--------------------------
अमरावती, अचलपूर शहरात रुग्णसंख्या अधिक
अमरावती शहर व अचलपूर शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने येथे कडक नियम पाळले जावेत, यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी. महापालिका, नगरपालिका यांनी लग्न समारंभात गर्दी आढळल्यास हॉलच्या संचालकावर कठोर कारवाई करावी. बँक्वेट हॉलमध्ये मास्कचे पालनही होत नसेल, तर संचालकावर कारवाई करावी. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नागरिकांकडूनही बेपर्वाई होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सगळीकडे कारवायांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिका०यांनी दिले. ज्या क्षेत्रात रुग्णांचे आधिक्य आढळून येते, तिथे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. मात्र, ॲन्टिजेन चाचण्यांऐवजी आरटी-पीसीआर चाचणीलाच प्राधान्य द्यावे. खासगी लॅबमधून ज्या ॲन्टिजेन टेस्ट होत आहेत, त्या बंद कराव्या.
---------------