३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

By Admin | Updated: June 1, 2015 00:42 IST2015-06-01T00:42:03+5:302015-06-01T00:42:03+5:30

नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद ...

Inspecting soil patterns in 398 villages | ३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

३९८ गावांमध्ये माती नमुन्यांची तपासणी

मृद आरोग्य अभियान : १७ हजार नमुने तपासणार
गजानन मोहोड अमरावती
नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण व सर्वेक्षणाच्या आधारे खतांच्या संतुलित वापरासाठी राज्यात मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत दर तीन वर्षांत एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३९८ गावांमध्ये १७ हजार ७४७ मृद नमुन्यांच्या तपासणीचे कृषी विभागाचे नियोजन आहे.
अमरावती तालुक्यातील १ हजार २६३, भातकुली १ हजार २७४, चांदूररेल्वे १ हजार २९७ व तिवसा तालुक्यातील १ हजार २७२ नमुन्यांची जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा अमरावती येथे तपासणी होणार आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही १ हजार २७०, दर्यापूर तालुक्यातील १ हजार २७०, अंजनगाव सुर्जी १ हजार २७८, मोर्शी १ हजार २८२ व वरुड तालुक्यातील १ हजार २७० अशा एकूण ६ हजार ३७१ मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे केली जाणार आहे.
धामणगाव तालुक्यामधील १ हजार २२०, चांदूरबाजार तालुक्यातील १ हजार २६९, अचलपूर तालुक्यामधील १ हजार ५५२, धारणी तालुक्यामधील १ हजार २६८ व चिखलदरा तालुक्यातील ९६१ अशा एकूण ६ हजार २७० मृद नमुन्यांची तपासणी माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथे होणार आहे. जिल्ह्यातील ३९८ गावामधील ६ हजार २०३ बागायती मृद नमुने व ११ हजार ५४४ जिरायती मृद नमुने तपासण्यात येणार आहेत. अन्य ५५ गावे प्रतीक्षा यादीत आहेत. केंद्र शासनाच्या स्वाईल हेल्थ कार्ड या अभियानामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीचे आरोग्य तपासता येणार आहे.

खतांच्या वापराने बिघडतो जमिनीचा पोत
सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने शेतकऱ्यांचा कल वर्षभरात दोन ते तीन पिके घेण्याकडे दिसून येतो. उत्पादन वाढविण्यासाठी जैविक व नैसर्गिक खतांऐवजी रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत आहे. या खतांच्या वापराने व अधिक पिके घेण्याच्या प्रकारामुळे जमिनीचा पोत बिघडून ती कडक होते व जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढते. यासाठी मातीचे परीक्षण करून कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. यामुळे कमतरता भरून काढण्यास मदत होते.

मातीमध्ये आहेत
१६ ते २० घटक
जिल्ह्यातील मातीमध्ये १६ ते २० घटक आढळून येतात. यामध्ये नत्र व स्फुरद कमी आहेत. याशिवाय सुक्ष्म खते, गंधक, झिंक, लोह, मॅग्नीज, मॅग्नेशिअमसारखे अनेक घटक कमी आढळून आल्याने पीक उत्पादनात घट येते.

Web Title: Inspecting soil patterns in 398 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.