गावातील योजनांच्या खर्चाची माहिती सूचना फलकांवर
By Admin | Updated: May 9, 2014 23:48 IST2014-05-09T23:48:51+5:302014-05-09T23:48:51+5:30
वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गावातील योजनांच्या खर्चाची माहिती सूचना फलकांवर
अमरावती : वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात ग्रामपंचायतीने विकासयोजनांवर केलेल्या खर्चाचाही माहिती गावातील सूचना फलकावर लिहिणे ग्रामसेवकांना सक्तीचे केले असून अशी माहिती न लिहिणार्या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. गावात कोणत्या विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत, त्यावर किती खर्च केला जात आहे. याची बहुतांश गावातील ग्रामस्थांना माहिती नसते. त्यामुळे सत्तेवर असलेले पदाधिकारी विकासाच्या योजनांसाठी आलेल्या निधीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार करतात, असा आरोप होतो. अशा कामात पारदर्शकता यावी अािण वाढत्या भ्रष्टाचारासारख्या घटनांना आळा बसावा याकरिता ग्रामसभेला जादा अधिकाराची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने भ्रष्टाचार्यांवर नियंत्रण मिळविले नसल्याची बाब अनेकांनी शासनाकडे पाठविलेल्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणा केली आहे. यातील कलम आठमध्ये (क) पोटकलम (एक) नंतर ग्रामपंचायत प्रत्येक सहा माहीमध्ये एकदा विकासविषयक कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवेल व त्याची माहिती पंचायतीच्या सूचना फलकावर लावील हे पोटकलम (एक क) असणार आहे. अशी सुधारणा त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातील ग्रामसेवकांना विकास योजनांवर झालेल्या खर्चाचा अहवाल सूचना फलकावर लावण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)