शेतकऱ्यांना मिळणार वातावरण बदलाची माहिती
By Admin | Updated: September 16, 2014 23:23 IST2014-09-16T23:23:58+5:302014-09-16T23:23:58+5:30
संत्रा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना दरदिवसाच्या हवामानातील बदलाची माहिती देण्याचा प्रकल्प वरुड तालुक्यात उभारला जात आहे.

शेतकऱ्यांना मिळणार वातावरण बदलाची माहिती
पिकांवरील रोगाचे संकेतही मिळणार : वरुड तालुक्यात संशोधन सुरु
अमरावती : संत्रा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना दरदिवसाच्या हवामानातील बदलाची माहिती देण्याचा प्रकल्प वरुड तालुक्यात उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिकावर कोणत्या हवामानात कोणत्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, याचा अंदाजही शेतकऱ्यांना घेता येणार आहे. ही सर्व माहिती शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘मॅसेज’ व्दारे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचा भ्रणध्वनी क्रमांक गोळा करण्याचे काम वरुड तालुक्यात सुरु आहे.
येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, भारतीय औद्योगिक संस्था मुंबई, भारतीय औद्योगिक संस्था हैद्राबाद आणि महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघाच्या संयुक्त विद्यमाने वरुड तालुक्यात या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या संशोधन प्रकल्पाचे अर्धेअधिक काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २ कोटी १४ लक्ष रुपये मंजुर केले आहे.
भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्यावतीने कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे, यासंदर्भात कृषी क्षेत्रातील संस्था व महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्यावतीने शेती पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानातील बदल व पाणी आणि कीड रोग व्यवस्थापनाचा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान संशोधन संस्थेने मंजुरात प्रदान केली. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचाही समावेश व्हावा म्हणून भारतीय औद्योगिक संस्था, मुंबई व हैद्राबाद या संस्थांना सोबतीला दिले. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मिळावी व त्यांच्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य व्हावे म्हणून श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने महाराष्ट्र संत्रा उत्पादक संघाला सोबतीला घेतले.
भूजल वापर आणि व्यवस्थापन, संत्रा पिकातील सिंचन, पाणी व्यवस्थापन व संत्रा पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन हे या प्रकल्पातील संशोधनाचे विषय आहेत. या संशोधनाचा पहिला टप्पा म्हणून वरुड तालुक्यात बारगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी रमेश जिचकार व नागझरी येथील श्रीधर सोलव यांच्या शेताची प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या या संत्राबागेत वायरलेस सेन्सर नेटवर्क ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ही यंत्रणा दरदिवसाच्या हवामानातील बदलाचा अचूक अंदाज घेणार आहे.
गत जुलै महिन्यात तापमानातील बदलामुळे व कोलोट्रोट्रिक या बुरशीच्या प्रादुर्भावाने संत्रा फळाची अधिक गळती झाली व सध्याही सुरु आहे. शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी संशोधन प्रकल्पातंर्गत तयार केलेल्या स्वयंचलित हवामानाचा आगावू अंदाज शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रकल्पाकरिता श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत वडनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख तथा संशोधक प्रमुख अमोल झापे, सहायक संशोधक प्रमुख शशांक देशमुख हे परिश्रम घेत आहेत. हे सयंत्र स्थापित करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रमुख शास्त्रज्ञ आदिनारायण, हैदराबादचे प्रमुख शास्त्रज्ञ फनिंद्रा व त्यांच्या चमूतील सूर्यकांत सावंत, मृणालिनी बडनेरकर यांनी प्रयत्न केले.