शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट गहू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:15 IST2021-02-27T04:15:26+5:302021-02-27T04:15:26+5:30
अन्नपुरवठा विभागाचे दुर्लक्ष : सामान्यांचा जीव मातीमोल गोपाल डहाके मोर्शी : येथील रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याचा ...

शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट गहू !
अन्नपुरवठा विभागाचे दुर्लक्ष : सामान्यांचा जीव मातीमोल
गोपाल डहाके
मोर्शी : येथील रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना दिल्या जाणाऱ्या स्वस्त धान्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. दुकानातून दर महिन्याला वितरित होणारा गहू टोचलेला असून, त्यात सोंडे आढळून आले आहेत. या प्रकाराबाबत रेशन लाभार्थींनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील स्वस्त धान्य दुकान मालक टी.पी. अग्रवाल यांच्या स्वस्त धान्य दुकानातून २५ फेब्रुवारी रोजी शिधापत्रिकेवर मिळालेले गहू हे अत्यंत खराब व सोंडे मिश्रित असून, सर्व गव्हाचे पीठ झाले आहे. व गव्हाच्या प्रत्येक दाण्याला छिद्र पडलेले असतानासुद्धा त्याचे वितरण केले जात आहे. ते गहू मनुष्याला काय, जनावरांनासुद्धा खाण्यायोग्य नाही. अग्रवाल यांच्या रेशन दुकान बाबत तहसीलच्या पुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. वजन व काटा सदोष आणि दुकानाची उघडण्याची वेळ नियमित नाही. मर्जीप्रमाणे दुकान उघडणे व मर्जीप्रमाणे धान्याचे वितरण करणे तसेच कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड न ठेवणे असा कारभार सुरू असल्याचा लाभार्थींचा आरोप आहे. बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना तो गहू वितरित केला जात असून, सामान्यांच्या जिवाचे काहीच मूल्य नाही का, असा सवाल रेशनधारकांनी उपस्थित केला आहे.
कोट
एखाद्या रेशन दुकानदाराला खराब व निकृष्ट दर्जाचा गहू गेला असेल, तर त्या दुकानदाराने तो गहू गोडाऊनमध्ये जमा करून चांगल्या प्रतीचा गहू घेऊन जाणे ही त्याची जबाबदारी आहे.
विलास मुसळे, अन्न पुरवठा निरीक्षक, तहसील मोर्शी
कोट २
शासन जसे धान्य पाठवते, ते वितरित करण्याची जबाबदारी आमची आहे. याबाबत शिधापत्रिकाधारकांनी तहसीलच्या पुरवठा विभागाकडे तक्रार करावी.
टी.पी. अग्रवाल, रेशन दुकानदार
---------