श्वसनाच्या आजारात वाढ
By Admin | Updated: July 21, 2015 00:18 IST2015-07-21T00:18:23+5:302015-07-21T00:18:23+5:30
शहरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्वसन विकाराच्या रुग्णांची माहिती इर्विन प्रशासनाला मागविली आहे.

श्वसनाच्या आजारात वाढ
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पत्र : इर्विन प्रशासनाला मागितली रुग्णांची माहिती
अमरावती : शहरात वाढत्या वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्वसन विकाराच्या रुग्णांची माहिती इर्विन प्रशासनाला मागविली आहे.
शहरात ५० हजारांपेक्षा अधिक वाहनांची दररोज वर्दळ सुरु असते. त्यातच कालबाह्य झालेली वाहने सर्रासपणे शहरात फिरत आहेत. त्यामुळे वाहनांच्या धुरामुळे हवेत वायू प्रदूषण वाढल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांंमध्ये भीती निर्माण झाली आहे. राज्यातील मुंबई आणि नागपूरसह १८ शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याचे एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात शासनाला आढळून आले. त्या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरातील शासकीय रुग्णालयाला श्वसन विकार जडलेल्या रुग्णांची माहिती मागविली आहे. अमरावतीमध्येही काही प्रमाणात वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता इर्विन प्रशासनाला रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे. रुग्णांची माहिती गोळा करण्याचे कार्य इर्विन प्रशासनाने सुरु केले आहे.
वायू प्रदूषण
राज्यातील १८ शहरांमध्ये प्रदूषणाने उंच्चाक गाठला आहे. त्याअनुषंगाने अमरावतीमधील रुग्णांची स्थिती जाणून घेण्यासाठी इर्विन रुग्णालयाला पत्र पाठवून रुग्णांची माहिती मागविण्यात आली आहे.
- अ. ज. कुडे,
उपप्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.
अमरावतीत ७५ टक्के वायू प्रदूषण
अमरावती जिल्ह्यात ७५ टक्क्यांच्या आसपास वायू प्रदूषण असून पेयजल प्रदूषणाचे प्रमाण २५ टक्के इतके आहे. ध्वनी प्रदूषण ५० टक्क्यांच्या आसपास आहे. जलप्रदूषण ६२.५० टक्के इतके असल्याची नोंद ‘नंबिओ’ या संस्थेच्या सर्वेक्षणात केली आहे.