चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:01 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:01:04+5:30
जीवनाआवश्यक वस्तू वगळता इतर कुठलाही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली. अजून किमान तीन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.

चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘कोरोना’ विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्याकरिता २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. या कालावधीत हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे जिल्ह्यातील साडेतीन ते चार हजार विक्रेते तसेच चहा कँटीन व अशा किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यावसायिकांची सरासरी एक ते दोन कोटींची दैनंदिन उलाढाल सद्यस्थितीत ठप्प आहे.
शहरात पाणीपुरी, भेळ, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, छोटेखानी हॉटेल, चहा कँटीन यांची जिल्ह्यात संख्या साडेतीन ते चार हजार असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाने दिली आहे. शहरात फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. सदर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर हजारो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. ‘रोजचे कमावणे व रोज खाणे’ अशी परिस्थिती असलेल्या हजारो व्यावसायिकांना व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी ३ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
जीवनाआवश्यक वस्तू वगळता इतर कुठलाही व्यवसायास संचारबंदीत प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याकारणाने २० दिवसांहून अधिक काळासाठी आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली. अजून किमान तीन आठवडे तरी त्यांना व्यवसाय सुरू करता येणार नाही. त्यामुळे आता चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. किमान एक किरकोळ व्यावसायिक दररोज किमान दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत व्यवसाय करतो. त्यामुळे जिल्ह्यात अशा व्यवसायिकांची ८० लाख ते दोन कोटी दैनंदिन उलाढाल असते. त्यामुळे अशा व्यावसायिकांचे लॉडाऊनच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखीन १७ दिवस लॉकडाऊन आहे.
कुणाला बँकेची किंवा इतर कर्जाची किस्त भरायची असते. कुणाला एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरायचा असतो किंवा तातडीची वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक किरकोळ व्यवसायिक भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यापुढे भाडे चुकविण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
लहान हॉटेल, किरकोळ व्यावसायिक, हातगाडीधारक, चहा कँटीन तसेच इतर खाद्यपदार्थ व्यावसायिक जिल्ह्यात साडेतीन ते चार हजार आहेत. अनेकांची एफडीएकडे नोंदणी झाली आहे.
- सचिन केदारे, सहायक आयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, अमरावती