अमरावती : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात देशातील शेतकरी उतरला आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ अखिल भारतीय संघर्ष समन्वय समिती व अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येथील इर्वीन चौकात मानवी श्रृंखला आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत शेतकरीविरोधी तीनही कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यात यावे, शेतकरी विरोधी वीजबील विधेयक पुढे रेटण्याचे कटकारस्थान बंद करावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट आधारभावाचे संरक्षण द्या आदी प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनावरील दडपशाहीचा निषेध यावेळी करण्यात आला. आंदोलनाचे अखिल भारतीय किसान संघाचे समन्वय समिती व जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिलच्यावतीने ही मानवी साखळी निर्माण करून जाहीर समर्थन देण्यात आले आहे. या आंदोलनात समन्वयक अशोक सोनारकर, सुभाष पांडे, डी.एस पवार, जे.एम. कोठारी, लक्ष्मण धाकडे, राजेंद्र भांबोरे, बाळासाहेब कुटेमाटे, सुनील घटाळे, नीळकंठ ढोके, चंद्रकांत बानुबाकोडे, नंदू नेतनराव आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.