आरागिरण्यांत अवैध लाकूड येतात कसे ?
By Admin | Updated: September 12, 2016 00:13 IST2016-09-12T00:13:50+5:302016-09-12T00:13:50+5:30
आडजात लाकूड कापण्याला मनाई असल्याचा देखावा केला जात असला तरी...

आरागिरण्यांत अवैध लाकूड येतात कसे ?
वनाविभागाचे दुर्लक्ष : सीमेवरुन लाकडाची वाहतूक रोखण्यात अपयश
अमरावती : आडजात लाकूड कापण्याला मनाई असल्याचा देखावा केला जात असला तरी वनाधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच शहरातील आरागिरण्यांमध्ये चोर मार्गाने अवैध लाकूड आणले जात आहे. विशेषत: वलगाव मार्गावरील आरागिरण्यांना वनाधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याची माहिती आहे.
अमरावती, बडनेरा शहरातील आरागिरण्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी वडाळी वनपरिक्षेत्रपालांकडे सोपविण्यात आली आहे. शहरातील आरागिरण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्वतंत्र वनपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आडजात अथवा अन्य लाकूड कापण्याला हल्ली वनविभागाकडून मनाई आहे. लाकूड कापण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र स्थानिक इतवारा बाजार, हमालपुरा, शाहू बाग, ताजनगर, वलगाव मार्गावर सर्रास येणारे लाकडाचे ट्रक हे रोखण्यात वनविभाग अपयशी ठारत आहे. किंबहुना वनाधिकाऱ्यांचे आरागिरणी संचालकांसोबत साटेलोटे असल्यामुळे शहरातील आरागिरण्यांत अवैध लाकूड आणले जात असताना कारवाई केली जात नाही, हे वास्तव आहे. एकीकडे आडजात लाकूड कापण्याला परवानगी नाही, असे वनविभागाकडून सांगतिले जाते. मात्र आरागिरण्यांमध्ये ट्रकमध्ये लादून दरदिवशाला येणारे लाकूड कोठून, कसे येतात? ही बाब वनाधिकाऱ्यांना चांगल्या तऱ्हेने माहीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपवनसंरक्षक हेमंत मीना हे नुकतेच रुजू झाले आहेत. त्यांच्या अखत्यारित जिल्हाभरातील आरागिरण्या येतात. मात्र उपवनसंरक्षक मीना हे नवखे अधिकारी असल्याचा गैरफायदा त्यांचे अधिनस्थ वनाधिकारी घेत आहेत. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या नावेदेखील आरागिरणी मालकांकडून अवैध लाकूड वाहतुकीसाठी मोठी रक्कम वसूल करीत असल्याची माहिती समोर आली आहे. चांदूरबाजार, चांदूररेल्वे, परतवाडा, मोर्शी, भातकुली, नांदगाव खंडेश्वर मार्गे आडजात लाकूड शहरातील आरागिरण्यांमध्ये आणले जात आहे. अवैध लाकडाची वाहतूक राजरोसपणे होत असताना गत दीड महिन्यांपासून एकाही आरागिरण्यांवर कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही, हा संशोधनाचा विषय आहे. आरागिरण्यांमध्ये नियमबाह्य काही होत असल्यास त्यावर अंकुश ठेवण्यासाठी वनपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सदर वनपाल शहरातील आरागिरण्यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे वास्तव आहे.
वलगाव मार्गावरील आरागिरण्यांना अभय
येथील वलगाव मार्गावरील आरागिरण्यांमध्ये अवैध लाकडाची वाहतूक केली जात असताना आरागिरणीत येणाऱ्या लाकडाची तपासणी, फिरत्या पथकाचे धाडसत्र थंडबस्तात पडले आहे. आरागिरणी मालकांना वनाधिकाऱ्यांकडून अभय का दिला जातो, हादेखील चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी वलगाव मार्गावरील दोन आरागिरणीत अवैध लाकूड आढळल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती, हे विशेष.
आरागिरण्यांची नियमित तपासणी सुरूच आहे. परवा पहाटे तीन सॉ मीलची तपासणी केली असताना बाभळाचे लाकूड आढळून आले. अवैध लाकूड असल्याची माहिती मिळाल्यास कारवाई केली जाईल.
- राजेंद्र बोंडे, सहायक वनसंरक्षक, अमरावती