हिरूळपूर्णाच्या मायलेकाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:01:09+5:30
मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती.

हिरूळपूर्णाच्या मायलेकाची कोरोनावर मात
सुमीत हरकूट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : कल्याण (मुंबई) येथून माहेरी परतलेल्या माय-लेकांमुळे तालुक्यात कोरोनाचा सर्वप्रथम शिरकाव झाला. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन व जिद्दीमुळे तालुक्यातील ते पहिले कोरोनाग्रस्त आता कोरोनामुक्त झाले आहेत. ते हिरूळपूर्णा येथील स्वगृही परतले आहेत. यामुळे गावच नव्हे, अख्ख्या चांदूरबाजार तालुक्यास दिलासा मिळाला आहे.
मुंबईहून माहेरी १७ मे रोजी परतलेली २५ वर्षीय महिला व तिच्या तीन वर्षीय मुलाला हिरूळपूर्णा गावातच क्वारंटाईन सेंटरवर ठेवण्यात आले. त्या महिलेच्या पतीचा अहवाल मुंबई येथे कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तालुका प्रशासनाने माय-लेकाला २२ मे रोजी अमरावती येथे हलविले. २४ मे रोजी रात्री ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच दहशत पसरली होती. त्या माय-लेकाला उपचारासाठी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच त्यांच्या संपर्कात आलेले नऊ नातेवाईक व १८ इतर व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. याशिवाय गावातील ५८ व्यक्तींना चांदूर बाजार येथील क्वारंटाईन सेंटरला दाखल करण्यात आले होते. सलग १३ दिवस वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये त्या माय-लेकाने कोरोनाशी झुंज दिली. त्या तीन वर्षीय चिमुकल्यास तर १३ दिवस ना आई दिसली, ना कुणी आप्त. कोविड रुग्णालयातील वार्डात त्याने डॉक्टर व परिचारिकांच्या स्नेहाने लढाई जिंकली. १३ दिवसानंतर पुन्हा दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये दोन्ही रुगणांचा अहवाल निगेटिव्ह आला तसेच या मायलेकाच्या संपर्कात आलेल्या सर्व २७ व्यक्तींचे अहवालसुद्धा निगेटिव्ह प्राप्त झाले. कोरोनामुळे दहशतीत सापडलेल्या हिरूळपूर्णा रहिवाशांनी यामुळे सुटकेचा श्वास सोडला. कोविड रुग्णालयातील उपचारानंतर ३ जून रोजी ते माय-लेक घरी परतले आहेत.
तूर्तास माहेरी
कोरोनावर यशस्वी मात करणारी महिला तिच्या मुलासह माहेरी हिरूळपूर्णा येथेच वास्तव्यास आहे. खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तालुका महसूल व आरोग्य प्रशासनाने खबरदारी घेत तातडीने सूत्रे हलविले. हायरिस्क, लोरिस्कच्या व्यक्तींची यादी बनवून त्यांना होम व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. अख्खे गाव सॅनिटाइज करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी ही संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याने संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले. परिणामी संसर्ग रोखला गेला.