९.६० लाख डोक्यांवर लागणार हेल्मेट
By Admin | Updated: February 7, 2016 01:00 IST2016-02-07T01:00:41+5:302016-02-07T01:00:41+5:30
औरंगाबाद-पुण्यापाठोपाठ संपूर्ण राज्यातच हेल्मेटची सक्तीचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे.

९.६० लाख डोक्यांवर लागणार हेल्मेट
निर्णय हेल्मेट अंमलबजावणीचा : जनजागृतीची मोहीम राबविणार
प्रदीप भाकरे अमरावती
औरंगाबाद-पुण्यापाठोपाठ संपूर्ण राज्यातच हेल्मेटची सक्तीचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. या अनुषंगाने राज्यासह जिल्ह्यातही हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीचे वादळ घोंगावत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यास जिल्ह्यात तब्बल ९.६० लाख डोक्यांवर हेल्मेट लागणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागामध्ये जिल्ह्यातील ४,८०,२५३ दुचाकींची नोंद आहे. वाहन चालविणाऱ्यांसोबतच मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट असणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमिवर एकट्या अमरावती जिल्ह्यात दुचाकींची संख्या पाहता ९ लाख ६० हजारांहून अधिक हेल्मेट लागणार आहेत. पुणे आणि औरंगाबाद येथे हेल्मेट सक्तीचा निर्णय लागू झाल्याने राज्यात सर्वत्र हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीबाबत पोलीस प्रशासन सर्व दृष्टीने अभ्यास करीत आहे. हेल्मेटमुळे डोक्याला दुखापतीची शक्यता कमी होत असल्याने हेल्मेटसाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यामुळे सक्ती करण्यापूर्वी पोलिसांकडून जनजागृतीची मोहीम हाती घेतली जाईल व त्यानंतरच हेल्मेट सक्तीची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस विभागाने दिले आहेत.
कसे असावे हेल्मेट ?
हेल्मेट आयएसआय मार्कचे असावे. हेल्मेट लाईट रंगाचे, अंधारात दिसेल असे असावे, काळ्या रंगाचे हेल्मेट नकोच. हेल्मेटला हनुवटीची पटरी असावी, हेल्मेटला लाल रंगाचे रिफ्लेक्टर असावे, मानेच्या मागच्या रुंदीइतका रिफ्लेक्टर असावा. लाल-पिवळ्या रंगाचे हेल्मेट असावे.
हेल्मेटची किंमत १५०० रुपयांपर्यंत
अमरावती शहरामध्ये ३८० ते पुढे १५०० रुपयांपर्यंत आयएसआय मानांकनाचे हेल्मेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हेल्मेट सक्ती नसतानाही दर महिन्याला ३०० ते ४०० हेल्मेट विकले जातात. यात बनावट आयएसआय मार्कचे हेल्मेटही चढ्या भावाने विकले जातात. त्यामुळे हेल्मेट खरेदी केल्यानंतर बिल अवश्य घ्यावे.
मागे बसणाऱ्यांनाही सक्ती
अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रक काढले. न्यायालयाने यासंदर्भात सन २००३ मध्येच आदेश दिले होते.
हेल्मेटचा नियम भल्यासाठी
हेल्मेट वापरण्याचे गांभीर्य आपल्याला नाही. सांभाळण्याचा कंटाळा येतो म्हणून आपण हेल्मेट घालण्याचे टाळतो. तरूण मंडळी तर केस विस्कटतील म्हणून हेल्मेट घालत नाहीत. परंतु हेल्मेट न घातल्यामुळे झालेला अपघात जीवावर बेतणारा असू शकतो. हेल्मेटचा नियम आपल्या सर्वांसाठी आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूकचे एसीपी बळीराम डाखोरे यांनी व्यक्त केली.