जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस

By Admin | Updated: July 21, 2015 00:06 IST2015-07-21T00:06:22+5:302015-07-21T00:06:22+5:30

मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.

Heavy rain till late July | जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस

जुलैअखेरपर्यंत दमदार पाऊस

हवामान तज्ज्ञांचा अंदाज नष्ट होणाऱ्या पिकांना जीवनदान   उकाड्या-पासून दिलासा
अमरावती : मध्यप्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा थोडा महाराष्ट्राकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने धोक्यात आलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पुढेही हीच स्थिती राहण्याची शक्यता असून अमरावती जिल्ह्यात २० ते २६ जुलैपर्यंत हलका-मध्यम व जुलैच्या अखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
यंदा भर पावसाळ्यात उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागले. त्यातच २५ दिवस पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र, १९ जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हीच परिस्थिती कायम राहण्याचे संकेत असून जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार, मध्यप्रदेशावर ६ ते ७ किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब, हरियाणा, आसाम मेघालयावरसुध्दा चक्राकार वाऱ्यांचे सावट आहे. त्यातच लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटक ते केरळ द्रोणीय स्थिती असून ती आणखी मजबूत झाल्यास महाराष्ट्रात पाऊस पडण्याकरिता फायदेशीर ठरणार आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय) गंगानगर, ग्वालियर ते बंगालच्या उपसागरापर्यंत झुकत असल्यामुळे पावसाची दाट शक्यता असल्याचे मत हवामानतज्ज्ञांचे आहे. या परिस्थिीतीमुळेच अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केली नसेल तर त्यांनी तत्काळ पेरणी करावी. शेतात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीनमध्ये आवश्यक असल्यास तणनाशक वापरू शकता. सर्व पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी करुन घेणे आवश्यक आहे. मोड आलेल्या शेतात तूर, तीळ, मका, सूर्यफूल हे कमी कालावधीचे सोयाबीणचे वाण पेरता येईल, अशी माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.

आपत्कालीन पीक नियोजन
पाऊस वेळेवर न येणे, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे या हवामानाच्या अनिश्चितपणामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय उपयायोजना कराव्यात, याकरिता अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उपाययोजना सुचविल्या आहेत. नियमित पावसाळा पाच आठवड्यापेक्षा अधिक उशिरा सुरु झाल्यास (२३ ते २९ जुलै) वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

ंजी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर होती त्यांना पावसाने जीवनदान दिले आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नागरिकांनी पाणी साठवून पाण्याचा योग्य वापर करावा.
- एस.आर. सरदार,
विभागीय कृषी सहसंचालक.

Web Title: Heavy rain till late July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.