उष्णतेची लाट पसरणार

By Admin | Updated: May 19, 2015 00:37 IST2015-05-19T00:37:55+5:302015-05-19T00:37:55+5:30

राज्यस्थान, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणारे वारे विदर्भात ...

Heat wave will spread | उष्णतेची लाट पसरणार

उष्णतेची लाट पसरणार

उन्हाच्या झळांमुळे नागरिक हैराण : २१ मे नंतर तुरळक ठिकाणी पाऊस
अमरावती : राज्यस्थान, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणारे वारे विदर्भात उष्ण हवा सोबत घेऊन येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासूनच उष्णतेची लाट पसरल्याचे दिसून चित्र पहायला मिळाले. त्यातच, मंगळवारनंतर विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
विदर्भात कमाल तापमान हळूहळू वाढत असून रात्रीच्या वातावरणात सुध्दा उकाडा निर्माण करीत आहे. श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्या हवामान विभागाने रविवारी ४१.५ व सोमवारी ४३ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद केली आहे. मात्र, तापमान आणखी वाढण्याची शक्यता असून मंगळवारी तापमान ४५ डिग्री पार करण्याचे संकेत आहे.
या दोन दिवसांत तापमान ४४ ते ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरात उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्याने अक्षरश: नागरिक हैराण झाले होते. उन्हामुळे जिवाची काहिली होत होती. शहरात फिरणाऱ्या प्रत्येकांच्या तोंडून 'बापरे बाप किती उन्ह' असेच वाक्य एकिवास येत होते.
मागील वर्षातील तापमान ४७ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. मात्र, यंदाचा उन्हाळा फारसा जाणवत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आतापर्यंत सुरु होती. मात्र, उन्हाळ्याच्या सरतेशेवटीच सूर्याचे उग्र रुप नागरिक नक्कीच अनुभवत आहेत. राज्यस्थानकडून विदर्भात उष्ण वारे येत असल्यामुळे मंगळवारनंतर उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या प्रभावाने ढगाळ वातावरण तयार होऊन पुन्हा पावसाची शक्यता आहे. उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते. तेच बाष्पाचे रुपांतर पावसाच्या स्वरुपात पडते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. उष्णतामान वाढल्याच्या प्रभावामुळे २१ मेनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. तप्त उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना सावध राहणे गरजेचे आहे.
महिनाभरात सोमवार सर्वात 'हॉट'
जल विज्ञान प्रकल्पांतर्गत सोमवारी कमाल ४५.५ व किमान २७.२ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात हे सर्वाधिक तापमान असल्याचे दिसून येत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शहरातील बहुतांश ठिकाणी वाहतूक कमी झाली होती. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट पसरली असून उत्तर-पश्चिम दिशेने उष्ण वारे विदर्भाकडे येत आहेत. त्यामुळे मंगळवारनंतर विदर्भातही उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. याप्रभावामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन २१ मेनंतर तुरळक ठिकाणी हलका पाऊससुध्दा पडण्याची शक्यता आहे.
- अनिल बंड,
हवामान तज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

Web Title: Heat wave will spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.