४० हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: September 12, 2016 00:16 IST2016-09-12T00:16:53+5:302016-09-12T00:16:53+5:30
आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक, आधारस्तंभ आहेत. भावी पिढी शारीरिक आणि मानसीकदृष्ट्या सुदृढ असावी, ..

४० हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
आरोग्य तपासणी नाहीच : पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे
मोहन राऊत धामणगाव रेल्वे
आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक, आधारस्तंभ आहेत. भावी पिढी शारीरिक आणि मानसीकदृष्ट्या सुदृढ असावी, याकरिता राज्य शासनाने शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमाची सुरूवात केली. मात्र धामणगाव तालुक्यातील या वैद्यकीय पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्याने ४ महिन्यांपासून विद्यार्थ्यांची तपासणी झाली नाही. त्यामुळे ४० हजार विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे़
राज्य शासनाने सन २००५-०६ या वर्षापासून राज्यभर विशेष शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम नियमित राबवायला सुरूवात केली़ इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते़ सन २००८-०९ पासून शासनाने या कार्यक्रमात बदल करून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू ठेवला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याचा हेतू या मागील होता़ मात्र तालुक्यात या कार्यक्रमाचे बारा वाजले आहे़
जबाबदारी स्वीकारणार कोण ?
लहान वयात गंभीर आजाराचे निदान वेळीच झाल्यास उपचार करणे सोयीचे ठरते, याचा अनुभव धामणगाव तालुक्यात आला आहे़ तालुक्यात १० वर्षांत हृदयविकार, हर्निया, अपेंडिक्स, टॉन्सिल्स, कर्करोग, मेंदूविकार, रक्तक्षय, रक्ताभिसरण, नेत्ररोग, कर्णरोग, श्वासोच्छवास, त्वचारोग अस्थीरोग,पचनक्रिया, दंतक्षय, अशा गंभीर आजाराचे विद्यार्थी रूग्ण आढळलेत.यातील अनेक रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु यंदा शालेय सत्र सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झालीच नाही़
जिल्हा शल्यचिकित्सक व जि़प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या अख्त्यारित शालेय आरोग्य तपासणी वैद्यकीय पथक कार्यरत असते. आजपर्यंत यासंदर्भात कोणीच पुढाकार घेतलेला नाही. आता जबाबदारी कोण स्वीकारणार, असा संतप्त सवाल आहे.
जिल्हा प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे तालुका व जिल्हा प्रशासनाची असते. मागील चार महिन्यांपासून धामणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली नाही अनेक विद्यार्थ्यांना लहानमोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे़ यासंदर्भात जिल्हा परिषद व माध्यमीक शाळेतील अनेक मुख्याध्यापकांनी तोंडी माहिती स्थानीक पंचायत समितीला दिली विशेषत: पंचायत समितीनीही जिल्हा प्रशासनाला आरोग्य तपासणी संदर्भातील ही गंभीर माहिती दिली. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा परिषदेने गांधारीची भूमिका घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे़
अल्पवेतन, वैद्यकीय चमुंचे राजीनामे
धामणगाव तालुक्याकरिता शालेय आरोग्य तपासणीत स्त्री वैद्यकीय अधिकारी म्हणून विशाखा निकोसे यांची नियुक्त करण्यात आली होती़ मात्र या प्रामाणिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मार्च २०१४ या महिन्यात डेंग्यू आजाराने मृत्यू झाला़ तद्नंतर पुरूष वैद्यकीय अधिकारी असलेले भरत पाटील यांनी चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला़ त्यापाठोपाठ आरोग्यसेविका बनसोड, औषध निर्माता लोचन पांडे यांनीही आपल्या पदाचे राजीनामा दिला आहे़ अथक परिश्रम घेत असताना मिळणाऱ्या अल्प वेतनामुळे राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे़ विशेषत: या वैद्यकीय पथकासाठी नेमलेल्या वाहनांचे भाडे आजही सुरू असून धामणगाव ग्रामीण रूग्णालयात हे वाहन कार्यरत आहेत़
धामणगाव तालुक्यातील शालेय आरोग्य तपासणीतील वैद्यकीय चमुने राजीनामे दिल्यामुळे विद्यार्थ्यांची तपासणी झाली नाही़ आता चांदूररेल्वे येथील वैद्यकीय पथकाची नेमणूक आगामी काळात करण्यात येणार आहे़ त्यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे फाईल पाठविण्यात आली आहे़
- एऩबी़पुनसे, समन्वयक, शालेय आरोग्य तपासणी पथक
तालुक्यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी या शालेय सत्रात झाली नसल्याचे पत्र आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेला पाठविले आहे़ वातावरणात होणाऱ्या बदलामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी त्वरित करणे गरजेचे आहे़
- सुषमा मेटकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती