मुख्याधिकारी निघाले वराह पकडायला!
By Admin | Updated: February 27, 2015 00:19 IST2015-02-27T00:19:01+5:302015-02-27T00:19:01+5:30
शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता ...

मुख्याधिकारी निघाले वराह पकडायला!
वरुड : शेंदूरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत वराहांचा उपद्रव वाढला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वाईन फ्लू आणि विषाणूजन्य तापाचा धोका लक्षात घेता नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेसह वराहांनासुध्दा गावातून हाकलून लावण्याचा निर्धार केला केला आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड हेदेखील या मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते.
वरुड तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ वाढली होती. यामध्ये शेकडो रुग्णांचे बळी गेले. तर दोन वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूनेसुध्दा वरुड शहरातील दोघांचे बळी घेतले. तालुक्यात स्वाईन फ्लूबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्वाईन फ्लू जनजागृती तसेच स्वच्छता मोहिमे अंतर्गत तालुक्यातील शेंदूरजनाघाट नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम आणि शहरात होत असलेला वराहांच्या मुक्त संचाराला आळा घालण्याकरिता वराह पकडण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरु केली. आरोग्य कर्मचारी असताना खुद्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश राठोड या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
नगरपरिषदेमध्ये आलेल्या नागरिकांनी विचारणा केली तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून साहेब वराह पकडायला गेले असल्याचे सांगितले जात होते. यामुळे साहेबच वराह पकडत असेल तर कर्मचाऱ्यांची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
शहरात वराहाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे स्वाईन फ्लू व इतर आजारांचे प्रमाण वाढलू नये दृष्टिने रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शहरातून वराहांना हद्दपार करण्याबाबत वराह मालकांना समज दिली जात आहे. वराह पालकांनी नगरपालिकेच्या पशू विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वराह पकडण्यास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी )