आसमंतात घातक वायूंचे ढग !
By Admin | Updated: February 9, 2016 00:04 IST2016-02-09T00:04:29+5:302016-02-09T00:04:29+5:30
अमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात.

आसमंतात घातक वायूंचे ढग !
प्रदूषण ठरतेय प्राणघातक : औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे संशोधन
संदीप मानकर अमरावती
अमरावतीकरांना ‘प्रदूषणा’ची समस्या काही नवीन नाही. वाढते ध्वनी, वायू प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असल्यावर वेळोवेळी चर्चा झडत असतात. परंतु वातावरणात किती घातक वायू पसरले आहेत. याची कल्पनाही सामान्यांना नसते. येथील शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तीन वर्षे सतत धुलीकणांमधील घातक वायुंंवर अभ्यासपूर्ण संशोेधन करून सादर केलेल्या अहवालातून ही भयानकता स्पष्ट होते.
वातावरणातील धुळीकणांमध्ये मागील तीन वर्षांत सल्फर आणि नायट्रोजन आॅक्साईडसह आरएसपीएमच्या (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर)प्रमाणात झालेली वाढ नाक, कान, घसा व छातीच्या वाढत्या आजारांसाठी कारणीभूत असल्याचे धक्कादायक तथ्यही या अहवालातून समोर आले आहे.
शासकीय औषधी निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी स्नेहा रामकृष्ण तिडके व विभा अशोक रामटेके यांनी तीन वर्षे या विषयावर सतत अभ्यास केला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणासाठी त्यांना विभागप्रमुख वैशाली नागुलवार यांचे मार्गदर्शन लाभले. उपरोक्त दोन्ही विद्यार्थिनींनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांची अभ्यासपूर्ण आकडेवारी गोळा केली. यामध्ये शहरातील विविध भागांतील हवेतील धुळीकणांचे नमुने घेऊन त्यावर संशोधन करण्यात आले.
घातक आजारात वाढ, मनोविकाराचे १३२५ रुग्ण
अमरावती : यामध्ये व्हीएमव्ही परिसरातील रहिवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी), राजकमल चौकातील वाणिज्य क्षेत्राचे सर्वेक्षण केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की, अमरावतीच्या धुळीकणांमध्ये आरएसपीएमचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. घातक वायुंच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन वर्षांत कान, नाक आणि घशाच्या आजारांनी बाधित तब्बल २,४३७ रुग्ण आढळले आहेत, तर छातीचे विकार (अस्थमा)ने २,२५६ रुग्ण हैराण आहेत. ८,३७२ लहान मुलांनाही विविध आजार घातक धुलिकणांमुळेच बळावल्याचे चित्र आहे. वातावरणातील धुलीकणातील घातक सल्फर व नायट्रोजन आॅक्साईडमुळे चक्क मनोविकराने बाधित १३२५ रुग्ण देखील आढळले आहेत. उपरोक्त अहवालातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर आणि तथ्यांचे सखोल अध्ययन केले असता अंबानगरीतील वाढते प्रदूषण रोखण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची नेमकी भूमिका काय, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
प्लास्टिकचा कचरा पेटवू नये
दररोज निघणाऱ्या घरगुती कचऱ्याचे प्रमाण मोठे असते. त्यात अनेक प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तुंचा देखील समावेश असतो. परंतु ज्या प्लास्टिक वस्तुमध्ये घातक सीएफसी (क्लोफ्लुरोकार्बन)चे प्रमाण आहे त्या वस्तू जाळल्याने वातावरणात घातक वायू पसरतात. त्यामुळे केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट महापालिकेनेच योग्य पध्दतीने लावावी.
प्रदूषणामुळे होऊ शकतात हे आजार
ब्राँकायटिस, क्रॉरोनिक फ्रायब्रासीस, ब्रानकोनिमोनिया, त्वचेचे विविध आजार, अस्थमा, फुफ्फुस, मनोविकार आदी आजार यामुळे बळावू शकतात. लहान मुलांच्या आरोग्यावरही यामुळे मोठा दुष्परिणाम होतो.
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार वाढले आहे. अनेकांना श्वास घेताना त्रास होतो.
-श्यामसुंदर निकम, अधीक्षक, सुपरस्पेशालिटी