विवाह सोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जातात पाहुणे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:14 IST2021-03-01T04:14:40+5:302021-03-01T04:14:40+5:30

वरूड : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, तर ...

Guests are invited to the wedding in stages? | विवाह सोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जातात पाहुणे?

विवाह सोहळ्यात टप्प्याटप्प्याने बोलावले जातात पाहुणे?

वरूड : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने सार्वजनिक कार्यक्रम, मंगल कार्यालये, सभागृह बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत, तर नियोजित विवाह सोहळ्यांना (कंटेनमेनट व लॉकडाऊनची शहरे वगळता) केवळ २५ लोकांना परवानगी देण्याचे आदेश आहेत. मात्र, हौसेला मोल नसल्याने आजही विवाह समारंभातील वऱ्हाडींची गर्दी ३००/४०० पेक्षा कमी झालेली नाही. प्रसंगी दंड भरू, मात्र वऱ्हाडी तर हवेच, असा अनेकांचा खाक्या आहे. काहींनी तर टप्प्याटप्प्याने पाहुण्यांना वेळेनुसार बोलावून समारंभ साजरा करण्याची नवीन शक्कल लढविली आहे. समारंभ वरकरणी परवानगीनुसारच पार पडत असले तरी कधीही गेले तरी पाहुणे २५ एवढेच दिसतील, अशी रीतसर व्यवस्था केली जात आहे. त्यातली मेख म्हणजे, चेहरे बदललेले असतात.

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने अमरावती, अचलपूर व अंजनगाव येथे कठोर लॉकडाऊनचे आदेश आहेत. भातकुलीसारख्या काही छोट्या शहरांत कंटेनमेंट झोन बनविण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धस्तरावर राबविण्यात येत आहे. ‘ नो मास्क - नो एन्ट्री’ असे फलक शासकीय ते खासगी आस्थापनेमध्ये झळकू लागले आहेत. वाहनचालकापासून तर सर्वसामान्य रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना मास्क आवश्यक आहे. विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून, केवळ विवाहाला लॉकडाऊन नसलेल्या ठिकाणी २५ लोकांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु, विवाह म्हटला तरी नात्यागोत्यांतीलच शंभर दोनशे नातेवाईक असतात. कोरोनामुळे अनेकांना ऑनलाईन लग्न लावण्याची वेळ आली. मात्र, यातूनही विवाह सोहळे करणाऱ्यांनी शक्कल लढवली आहे. आलेल्या पाहुण्यांना नजीकच्या परिसरात ठेवून राहत्या घरातच समारंभ परवानगीनुसारच पार पडत असल्याचा आभास करायचा. आलेल्या १००/२०० पाहुण्यांपैकी केवळ पंगत बसली की आणायचे, पुन्हा त्यांचे जेवण आटोपले की नवे २५. त्यामुळे कधीही गेले तरी पाहुणे २६ एवढेच दिसतील. पालिकेचे तपासणी पथक गेल्यास त्यांना सर्व काही आलबेल दिसेल, अशी ही शक्कल लढविली जात आहे.

कुणाला नाही म्हणायचे?

लॉकडाऊन काळात होणारे विवाह किमान दोन-तीन महिन्यांपूर्वी जुळलेले आहेत. त्यानुसार, नातेवाईक, मित्रमंडळींना पत्रिका पाठविण्यात आल्या. मंगल कार्यालयाला २००-३०० वऱ्हाडींच्या भोजनाची व अन्य सुविधांसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम देण्यात आली. आता अगदी वेळेवर गत आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तो ८ मार्चपर्यंत वाढविण्यातदेखील आला. त्यामुळे आता कुणाला बोलवायचे, कुणाला टाळायचे, असा पेच निर्माण झाला. त्यामुळे एक-एक तासाने आमंत्रितांना बोलावण्याची नवी शक्कल लढविली जात आहे.

सोशल मिडिया सुसाट

मंगल कार्यालयात आधी ५० वऱ्हाडींना परवानगी देण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्यास २५ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई केली जाते. त्यावर वधुपित्याने डोके लावल्याचा हसरा संदेश सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे. तो संदेश असा.

लग्नाची वेळ सकाळी १०.४०, स्नेहभोजन वेळ : वरपक्ष नातेवाईक : ११ ते १२ (संख्या ४८ ), वधुपक्ष नातेवाईक : १२ ते १ (संख्या ४९), मित्र, मैत्रिणी १ ते २ (संख्या ४५), आॅफिस स्टाफ- २ ते ३ (संख्या ४४), कॉलनीतील निमंत्रित दुपारी ३ ते ४ (संख्या ४८ )

पत्रिका न दिलेले आगंतुक : ४ ते ५ (संख्या अंदाजे ४०), नवरा-नवरी पंगत सायंकाळी ५ ते ६, (संख्या ४६) तपासणी पथक कधीही आले तरी संख्या ५० च्या आत?

Web Title: Guests are invited to the wedding in stages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.