पळाऽऽ पळाऽऽ पालकमंत्री आले...

By Admin | Updated: October 13, 2016 00:18 IST2016-10-13T00:18:59+5:302016-10-13T00:18:59+5:30

सर्वसामान्याच्या वेषात पालकमंत्र्यांनी बच्छराज प्लॉट येथील वरली-मटका व्यवसायावर धाड टाकताच आरोपींची दाणादाण उडाली.

Guardian minister came running ... | पळाऽऽ पळाऽऽ पालकमंत्री आले...

पळाऽऽ पळाऽऽ पालकमंत्री आले...

आरोपींची दाणादाण : अवैध व्यवसायाविरुद्ध कसली कंबर
अमरावती : सर्वसामान्याच्या वेषात पालकमंत्र्यांनी बच्छराज प्लॉट येथील वरली-मटका व्यवसायावर धाड टाकताच आरोपींची दाणादाण उडाली. पळाऽऽ पळाऽऽ पालकमंत्री आले, अशा शब्दात ऐकमेकांना सावध करुन आरोपी पळू लागले. मात्र, सिंघम पालकमंत्र्यांनी चार आरोपींना पकडलेच. पालकमंत्र्यांच्या या दबंग कारवाईचे समस्त अमरावतीकरांकडून कौतुक केले जात आहे.
शहराचे पालकत्व प्रवीण पोटे यांच्याकडे आहे. त्यांच्या केवळ एका शब्दावर पोलीस विभागाकडून कारवाई होऊ शकते. असे असूनही खुद्द पालकमंत्र्यांना पोलिसांप्रमाणे कारवाई करावी लागली. अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. मात्र, पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध व्यवसाय फोफावत आहेत. शहरात पनपणारे हे अवैध व्यवसाय गुन्हेगारीला बळ देत असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निदर्शनास आले होते. शिवाय अवैध व्यवसायांना कंटाळलेल्या नागरिकांच्या तक्रारीसुद्धा त्यांना प्राप्त झाल्या होत्या. शासनाची छबी त्यातून मलिन होत होती. अति झाल्यामुळे पालकमंत्रीच रस्त्यावर उतरले. सगळे शहर विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात मग्न असताना पालकमंत्र्यांनी चित्रा चौकाजवळील बच्छराज प्लॉट परिसरातील वरली-मटक्याच्या अड्ड्यावर धाड टाकून गुन्हेगारी जगताचे रावणदहन केले. पालकमंत्री ५५ क्रमांकाच्या वाहनातून अड्ड्याजवळ पोहोचले. वाहनातून उतरुन थेट जुगार अड्ड्याकडे त्यांनी कूच केली. पालकमंत्री त्याठिकाणी पोहोचताच तेथे उपस्थित आरोपींना काहीही सुचेनासे झाले होते.

पालकमंत्र्याजवळ अवैध व्यावसायिकांची जंत्रीच
अमरावती : दररोज बिनधास्तपणे जुगाराचे आकडे लावताना लुडबूड करणारे अनेक लोक त्यांच्या दृष्टीस पडत असत. मात्र, खुद्द पालकमंत्र्यांनाच समोर पाहून आरोपींची घाबरगुंडी उडाली. त्यांच्या तोंडून आपसूक शब्द निघालेत, की पळा..पळा..पालकमंत्री आलेत. मात्र, पळून जाण्याच्या प्रयत्न यशस्वी होण्यापूर्वीच पालकमंत्र्यांचे हात आरोपींच्या कॉलरपर्यंत पोहोचले. त्यांनी दोन आरोपींना खेचत बाहेर आणले. पालकमंत्र्यांसोबत चार कार्यकत्यांनीही अन्य दोन आरोपींना पकडून ठेवले होते. चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना फोनवर माहिती कळविली. काही वेळातच पोलीस आयुक्तांसह शहर कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. पालकमंत्र्यांच्या या धाडीमुळे तेथील रहिवाशांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता. पालकमंत्र्यांनी त्यानंतर रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीतीचे निराकारणही केले.
अवैध व्यवसायिकांच्या नावानिशीची यादीच पालकमंत्र्याजवळ आहे. अनेक त्रस्त नागरिकांनी थेट प्रवीण पोटे यांच्याकडेच अवैध व्यवसायासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. त्याचा एक नमुना दसऱ्याच्या दिवशी बच्छराज प्लॉटमध्ये पडलेल्या धाडीवरून लक्षात येतो. त्याचप्रमाणे राजापेठ, रेल्वेस्थानक चौक, हमालपुरा, फे्रजरपुरा, यशोदानगरात भारत चौधरी, इतवारा बाजारात बाबाद्दीन, कालाराम मंदिर आदी ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याची माहिती पालकमंत्र्यांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आता पालकमंत्री याबाबत कोणता ‘स्टँड’ घेतात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन सीपींसोबत घेतला होता शहराचा आढावा : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सीपी राजकुमार व्हटकर यांना सोबत घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. पोटे यांनी व्हटकर यांना स्वत:च्या वाहनात बसवून स्वत: वाहन चालवित शहराची ही निरीक्षण रपेट पूर्ण केली होती. इतकेच नव्हे तर पालकमंत्र्यांनी सीपींना शहरातील अस्तव्यस्त वाहतूक व अन्य अव्यवस्था देखील प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिली होती.

रहिवाशांसोबत साधला संवाद
आरोपींना पकडल्यानंतर पालकमंत्र्यांनी बच्छराज प्लॉट येथील रहिवाशांसोबत संवाद साधला. या अवैध व्यवसायाविरुद्ध त्यांनी आजपर्यंत तक्रार का केली नाही?, असा सवाल त्यांनी रहिवाशांना केला. त्यावर, हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांच्या या व्यवसायाची माहिती पोलिसांना देखील आहे. मात्र, पोलीस त्याकडे लक्ष देत नाहीत. मग, आम्हा सामान्यांच्या तक्रारींची दखल घेणार कोण? असा प्रतिप्रश्न नागरिकांनी पालकमंत्र्यांना विचारला.

‘बॉडीगार्ड’विनाच धडकले
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुरक्षेसाठी २४ तास अंगरक्षक सज्ज असतात. मात्र, अवैध व्यवसायावर धाड टाकताना पालकमंत्र्यांनी सुरक्षा रक्षकालादेखील सोबत नेले नाही. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जावून पालकमंत्र्यांनी ही धाड टाकली. या छापामार कारवाईची मोठी चर्चा शहरात आहे.

भाई, आकडा कहां लगाना पडता ?
धाड टाकल्यानंतर पालकमंत्री नागरिकांशी संवाद साधत असतानाच एक इसम तेथे आला. तो सट्टा लावण्यासाठी आला होता. त्याने थेट पालकमंत्र्यांनाच विचारले, भाई, आकडा कहां लगाना पडता है ? हा प्रकार बघून उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मित फुलले अन् पालकमंत्री संतापाने लालबुंद झाले.

कोतवाली पीआय सूर्यवंशीसह पाच जण निलंबित
अमरावती : अवैध धंद्याचे उच्चाटन करण्यास असमर्थ ठरलेल्या व वरिष्ठांच्या आदेशांचे वारंवार उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कोतवालीच्या पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक व तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. बुधवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा या कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जारी केले.
मुख्यालय सोडता येणार नाही
अमरावती :पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी २८ व ३० जुलै तसेच ४ आॅक्टोबरला अर्ध शासकीय पत्राद्वारे सुचित केले होते. पोलीस उपायुक्त यांनीही १६ व २० जून तसेच ७ आॅक्टोंबर रोजी पत्राद्वारे सुचना दिल्या होत्या. तसेच गुन्हेपरिषदेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी लेखी व तोंडी आदेश दिलेत. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे ठाणेदारांनी दुर्लक्ष करून कोतवाली हद्दीत अवैध धंदे सुरुच ठेवले. वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केले व अवैध धंदे करणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाठबळ देऊन अवैध धंदे सुरु ठेवल्याचा आरोप संबंधित पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. .
पोलीस निरीक्षक किशोर सुर्यवंशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुशील चौरे, पोलीस शिपाई गजानन सहारे, अब्दुल कलाम अब्दुल कादीर व गजानन ढेवले यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत पोलीस निरीक्षक यांना पोलीस नियंत्रण कक्षात राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

अवैध धंदे खपवून घेणार नाही : प्रवीण पोटे
पालकमंत्र्यांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून आरोपींना रंगेहात पकडले. त्यांनतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक घटनास्थळी पोहोचले. शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु असताना पोलीस काय करीत आहेत, असा सवाल त्यांनी पोलीस आयुक्तांना केला. भ्रष्टाचार व अवैध धंदे कदापिही खपवून घेणार नाही. अवैध व्यावसायिक राजरोसपणे गरिबांना लुबाडत आहेत. पालकमंत्री या नात्याने गरिबांची छळवणूक थांबविण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करा, असे खडे बोल पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सुनावले. सुशासनाची अनुभुती लोकांना मिळावी, हीच सरकारची भूमिका आहे. ‘मार्इंड सेट’ करून जबाबदारीने कामे करा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीही पालकमंत्र्यांनी दिली.

Web Title: Guardian minister came running ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.