सोयाबीनला मूग, उडीद, ज्वारीचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:01:34+5:30
यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सोयाबीनला मूग, उडीद, ज्वारीचा पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांची काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास सोयाबीनला मूग, उडीद व ज्वारीचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय आंतरपीकदेखील घेता येऊ शकते, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकासाठी २ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. मागील वर्षी २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली होती. त्यामुळे यंदा किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची वाढ होण्याची शक्यता असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळी झालेल्या अतिपावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दाणा बारीक झाला व उत्पादनातदेखील घट आलेली असल्याने यंदाच्या हंगामात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता नसल्यास वा किमतीमध्येही वाढ झाल्याने एखाद्या शेतकऱ्याला अडचण आल्यास अन्य पिकांचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मूग, उडीद व ज्वारीची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत करता येऊ शकते. ज्वारीमध्ये मूग व उडदाचे आंतरपीक घेता येते तसेच ज्वारीला भावदेखील आहे. कडब्याला मागणी व अधिक दर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नांदगावमध्ये सर्वाधिक, वरुडमध्ये किमान क्षेत्र
सोयाबीनसाठी २ लाख ६८ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर ४६ हजार २००, अमरावती ३२ हजार ५००, चांदूर रेल्वे २६ हजार, भातकुली २५ हजार, चांदूर बाजार २२ हजार ८००, तिवसा २१ हजार, धामणगाव रेल्वे १८ हजार ५००, मोर्शी १८ हजार २००, दर्यापूर १२ हजार ८००, अचलपूर १२ हजार ७००, चिखलदरा ११ हजार ५००, अंजनगाव सुर्जी ११ हजार, धारणी ९ हजार ३०० व वरूड तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यात येणार आहे.
असे आहे ज्वारीचे व्यवस्थापन
खरीप ज्वारीची पेरणी साधारणपणे २५ जून ते १५ जुलै या दरम्यान करता येते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव होतो. पेरणीसाठी हेक्टरी ७.५ किलो संकरित व १० किलो सुधारित वाणाचे बियाणे वापरावे. पेरणी तिफणद्वारे दोन चाळ्यांच्या पाभरीने करावी व दोन ओळींमध्ये ४५ सेंमी अंतर असावे. पहिली विरळणी १० ते १२ व दुसरी २० ते २२ दिवसांनी करावी. ज्वारी रासायनिक खताला चांगला प्रतिसाद देत असल्याने कृषितज्ज्ञांच्या सल्याने खतांची मात्रा द्यावी. ज्वारीमध्ये मूग, उडीद व तुरीचे आंतरपीकदेखील घेता येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
सोयाबीन क्षेत्रवाढीची शक्यता असली तरी शेतकरी घरचे बियाणे प्रक्रियेद्वारे वापरत असल्याने तुटवडा भासणार नाही. सोयाबीनला ज्वारी, मूग व उडीद तसेच आंतरपीक हा पर्याय उपलब्ध आहे.
- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी