ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका
By Admin | Updated: March 11, 2015 00:28 IST2015-03-11T00:28:53+5:302015-03-11T00:28:53+5:30
जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे.

ई-निवडणूक पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुका
लोकमत विशेष
अमरावती : जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुका प्रथमच ई-निवडणूक पद्धतीने होणार आहे. संगणकीय प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे दोष विरहीत व कमी वेळेत होण्याची अपेक्षा आहे.
सद्यस्थितीमध्ये शासनाच्यावतीने सर्व क्षेत्रामध्ये संगणक व इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारापासून राज्य शासनाच्या कामकाजापर्यंत या प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. यामुळे विविध कामकाजामध्ये पारदर्शकता आली असून तसेच कमी वेळेमध्ये काम होत आहे. अशातच पैशाचीही बचत होत आहे. सर्वच विभागात या प्रणालीचा उपयोग वाढत असल्यामुळे कामकाजामध्येही सुलभता आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व प्रक्रिया संगणक व इंटरनेट प्रणालीचा उपयोग करून घेतल्या जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यात होऊ घातलेल्या ५३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे.
विशिष्ट आज्ञावली अर्थात सॉफ्टवेअर विकसीत करण्यात आले आहे. यांच्या माध्यमातूनच उमेदवारी अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिलेल्या नमुन्यामध्ये व निर्देशाप्रमाणे सॉफ्टवेअरमध्ये अर्ज भरावा लागणार आहे. याची प्रिन्ट काढून पुन्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे. यावर अधिकाऱ्यासमोर सही करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया किचकट स्वरुपाची असते. शासनाला यामध्ये मनुष्यबळ व पैसा अधिक प्रमाणात खर्च करावा लागतो यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ई-निवडणूक पद्धत महत्वाची ठरणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यामुळे वेळ वाचणार आहे. मात्र निवडणूक लढवू इच्छूकांना यासाठी गावखेड्यातून तालुका अथवा सुविधा असलेल्या ठिकाणी जावूनच प्रक्रिया करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)