भांडणे मिटविण्यासाठी शासनाचे एक कोटी रूपये खर्च
By Admin | Updated: December 20, 2014 00:18 IST2014-12-20T00:18:05+5:302014-12-20T00:18:05+5:30
महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केल्यापासून एकट्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात बक्षिसापोटी या मोहिमेवर गेल्या पाच वर्षांत एक कोटी रूपये खर्च करण्यात आले.

भांडणे मिटविण्यासाठी शासनाचे एक कोटी रूपये खर्च
अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र शासनाने तंटामुक्त गाव मोहीम सुरू केल्यापासून एकट्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात बक्षिसापोटी या मोहिमेवर गेल्या पाच वर्षांत एक कोटी रूपये खर्च करण्यात आले. खर्च करण्यात आलेल्या रकमेचा उपयोग संबंधित गावांना किती प्रमाणात झाला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत पांढरी खानमपूरला पाच लाख, भंडारज, टाकरखेडा मोरे व दहिगाव रेचाला प्रत्येकी चार लाख व धनेगावला तीन लाख रूपये बक्षिसादाखल देण्यात आले आहेत. या पोलीस स्टेशनला बक्षिसांची रक्कम आतापर्यंत ५९ लाख रूपये प्राप्त झाली. रहिमापूर पोलीस ठाण्यातील गावांना २३ लाख रूपये, खल्लार पोलीस ठाण्यातील गावांना १८ लाख रूपये देण्यात आले आहेत.
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत यापूर्वी चौसाळा ग्रामपंचायतीला पाच लाख, निमखेड बाजार व अडगाव खाडेला प्रत्येकी चार लाख, तुरखेड व कारला प्रत्येकी तीन लाख, बोराळा, दख पोही, शेलगांव, हिरापुरला प्रत्येकी अडीच लाख रूपये, जवळा, खोडगांव, हंतोडा, खिरपाणी, लखाड, खिराळा या गावांना प्रत्येकी दोन लाख व काकदरी या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावाला एक लाख रूपये देण्यात आले.
रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सातेगावला सात लाख, कुंभारगाव आणि मुऱ्हादेवीला प्रत्येकी तीन लाख, खिरगव्हाण, काळगव्हाण, वनोजा, सोनगावला प्रत्येकी दोन लाख रूपये, वरूडा व मलकापूर ग्रामपंचायतला प्रत्येकी एक लाख रूपये देण्यात आले असून कापूसतळणी, एकलारा, जवर्डी, हिंगणी व गावंडगाव ही गांवे बक्षिसास पात्र ठरली आहेत. खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत कसबेगव्हाण, कोकर्डा, साखरी, शेंडगाव या गावांनाही लवकरच बक्षीस प्राप्त होणार आहे.
बक्षिसांचा विनियोग कसा करावा याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत व हे अधिकार ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला न देता ग्रामसभेला देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षणाबरोबरच या पुरस्काराचे देखील लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. मात्र एका चांगल्या हेतूने सुरूवात झालेल्या शासनाच्या या मोहिमेची दखल जागतिक पातळीवर अन्य राष्ट्रांनी घेतली असली तरी बक्षिसांची रक्कम ग्रामपंचायत सरपंच व सचिव खर्च करतात. ज्या तंटामुक्ती अध्यक्षाने गावात भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला त्याला फक्त बक्षिस वितरणाच्या वेळी फोटो पुरते बोलावण्यात येते. खर्च कुठे करावा याबाबत त्याला अजिबात विचारण्यात येत नाही, अशी खंत टाकरखेडा मोरे येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनायक तायडे यांनी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)