टपाली मतदानासाठी शासकीय कर्मचार्यांची अनास्था
By Admin | Updated: May 23, 2014 23:32 IST2014-05-23T23:32:13+5:302014-05-23T23:32:13+5:30
लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी १८ हजारांवर अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सीमेवरील जवानांना टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या. यामध्येही ४८१ मतपत्रिका अवैध ठरली. २७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे.

टपाली मतदानासाठी शासकीय कर्मचार्यांची अनास्था
अमरावती : लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सहभागी १८ हजारांवर अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सीमेवरील जवानांना टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या. यामध्येही ४८१ मतपत्रिका अवैध ठरली. २७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला आहे. टपाली मतदानाविषयी अनास्था पाहता या कर्मचार्यांना मतदानाची सक्ती करणे गरजेचे आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे जरुरी आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भारत निर्वाचन आयोगाद्वारा नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. शाळा, महाविद्यालये, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग यामध्ये असतो. या सर्वांचा परिणाम यंदा लोकसभा निवडणुकीवर झाला. सर्वसामान्य मतदार भर उन्हात मतदान करीत असताना निवडणूक यंत्रणेमधील कर्मचार्यांनी टपाली मतदान करण्याची तसदी घेतलेली नाही,असे टपाली मतदानाच्या संख्येवरुन स्पष्ट झाले आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये १२ हजार कर्मचार्यांचा सहभाग होता. सीमेवर तैनात असणारे २,९५० जवान तसेच ४००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा मतदानाचा अधिकार अबाधित रहावा यासाठी निवडणूक विभागाने अर्ज भरुन घेऊन त्यांना टपाली मतपत्रिका पाठविली. १५ मे पर्यंत निवडणूक विभागाला केवळ ३,४७९ मतपत्रिका प्राप्त झाल्यात. शासकीय कर्मचार्यांच्या ४८१ टपाली मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत. त्यामुळे २,९७१ टपाली मत वैध ठरले आहेत. प्रक्रिया सुलभतेने, पारदर्शी व गतिमान पध्दतीने व्हावी यासाठी आयोगाद्वारा मतदान यंत्राचा वापर करण्यात येतो व या यंत्राची हाताळणी करणारे सुजाण कर्मचार्यांचे ४८१ मते अवैध ठरणे ही शोकांतिका आहे. (प्रतिनिधी)