गोवंश वाहतुकीचा ट्रक पकडला
By Admin | Updated: September 22, 2016 00:17 IST2016-09-22T00:17:31+5:302016-09-22T00:17:31+5:30
मध्यप्रदेशातून परतवाडा येथे ट्रकमध्ये १८ गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक परतवाडा पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता बहिरम नजीक पकडला.

गोवंश वाहतुकीचा ट्रक पकडला
आरोपी पसार : बैतूल-परतवाडा मार्गावरील घटना
परतवाडा : मध्यप्रदेशातून परतवाडा येथे ट्रकमध्ये १८ गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रक परतवाडा पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजता बहिरम नजीक पकडला. मात्र ट्रकचालक व सहकारी ट्रक सोडून पळाले. पोलिसांनी ट्रक जप्त करून गुरांना सैतूतबाग येथील गोशाळेत ठेवण्यात आले.
मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गुरांना ट्रकमध्ये भरुन कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे चित्र नेहमीचेच आहे. बुधवारी दुपारी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लहाने यांना हा ट्रक संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये १६ गोऱ्हे, एक बैल व वासरु अशी एकूण १८ गुरे कोंडली होती. या गुरांचे पाय बांधण्यात आले होते व हा ट्रक क्रमांक डीएलयुजी ३९६५ आरटीओ चेक पोस्टवरुन बेदरकारपणे आला होता. ट्रकसोबत असलेल्या दोन्हीं व्यक्तींनी पळ काढला.
सैतुतबागमध्ये गुरांना ठेवले
या ट्रकमधील गुरांना शहरातील सैतूतबाग येथील गौशाळेत ठेवण्यात आले. शहरातील गौप्रेमी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ट्रकची चौकशी करुन कारवाईची मागणी केली आहे. सदर ट्रक दिल्ली पासिंग असल्याने मध्यप्रदेशातून परतवाडा मार्गे जनावरांना विक्रीसाठी दिल्ली येथील कत्तलखान्यात नेल्या जात असल्याचा आरोप संजय लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. (प्रतिनिधी)
चेक पोस्ट कशासाठी?
कोट्यावधी रुपये खर्चून परतवाडा-बैतूल मार्गावर आरटीओ विभागामार्फत चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. नवीन तंत्रज्ञानासह सुसज्ज चेकपोस्ट व नेमकी कश्याची तपासणी केल्या जाते. यावरच आता संशय व्यक्त केल्या जात आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात हफ्तेखोरी होऊन वाहन न तपासता सोडून दिल्या जात असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. परतवाडा येथील फरार आरोपींचा तपास करीत आहे.