सुरळी-बेलखेडा रस्ता गेला वाहून
By Admin | Updated: July 5, 2016 00:27 IST2016-07-05T00:27:09+5:302016-07-05T00:27:09+5:30
तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळातील वणी बेलखेडा परिसरात सलग तीन तास मुसळधार पाऊस झाला.

सुरळी-बेलखेडा रस्ता गेला वाहून
चारगढ धरण ९० टक्के भरले : चार गावांना सतर्कतेचा इशारा
सुमित हरकुट चांदूरबाजार
तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी मंडळातील वणी बेलखेडा परिसरात सलग तीन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बेलखेडा-सुरळी गावाचा १५ ते २० फुटांचा रस्ता वाहून गेल्याने या दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. परिसरातील चारघड धरण ९० टक्के भरले असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिली.
तालुक्यात शनिवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान मुसळधार पावसाने वणी गावातील रस्ते, नाले ओसंडून वाहत होते. पाण्याचा प्रवाहाने बेलखेडा-सुरळी मार्गावरील नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत होता. पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तुटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच नालाकाठावरील शेतात पाणी शिरल्याने शेती खरडून निघाली आहे.
तालुक्यातील वणी, बेलखेडा, रेडवा, चिंचकुंभ या भागातील शेती खरडून गेली आहे. यामुळे नुकतीच पेरणी झालेले शेकडो एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात शनिवारी रात्री झालेल्या सलग ३ तास पावसाने १०५ मि. मी. पाऊस पडल्याची माहिती आहे.